बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज तळोजा कारागृहातून ठाणे येथे आणले जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली व त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर विरोधी नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ”बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे”, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
12 व 13 ऑगस्ट रोजी नराधम अक्षय शिंदे याने चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. पालकांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 11 तास लावले होते. याचा संताप म्हणून 20 ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक रस्त्यावर उतरले. आठ तास बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल कोर्टानेही घेतली.
आज जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे – आदित्य ठाकरे
”बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील. पण या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि या लपवालपवीचा काही संबंध आहे का? याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.