सरकारकडून राज्यभरातील रेशन दुकानांवर शंभर रुपयांत गरीबांसाठी सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप जून अखेरीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याची झळ राज्यभरातील गरिबांना बसणार आहे.
राज्य सरकारकडून गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा मिळाला होता. त्यानंतर येणाऱया सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती. सोबतच बीपीएल कार्डधारकांना प्रती कार्ड एक साडी देण्याचे, दोन पिशव्या देण्याचे नियोजन होते.
पंतप्रधानांचे फोटो ठरले अडचणीचे
‘आनंदाचा शिधा’ देण्यासाठी वापरल्या जाणाऱया पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याने आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आनंदाचा शिधा बंद ठेवण्यात येणार आहे.