लेख – भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचलेली आहे. पाकिस्तानला 24 व्यांदा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज देणार आहे आणि हे कर्ज मिळवण्याकरिता पाकिस्तान एक लोकशाही पाळणारा मवाळ देश आहे हे सिद्ध करत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी सैन्य नवाझ शरीफ यांना भारताबरोबर आपले संबंध सुधारायला सांगत आहे. मरियम नवाझ शरीफ यांची कर्तारपूर गुरुद्वारा भेट आणि तेथे आलेल्या हिंदुस्थानी शीख समुदायाशी केलेली चर्चा याकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवे.

भारतातील पंजाब राज्यातून शिखांचा एक जथा कर्तारपूर गुरुद्वारा, जो पाकिस्तानमध्ये आहे, तिथे शिखांचा एक महत्त्वाचा सण ‘बैसाखी’ 18 एप्रिलला साजरा करायला गेला होता. तिथे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ, ज्या पाकिस्तानचे पूर्वपंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत, त्यांनी या गुरुद्वारामध्ये येऊन या जथ्याशी बातचित केली.

मरियम शरीफ यांनी आपले वडील नवाझ शरीफ यांची इच्छा भारताबरोबरचे आपले संबंध मजबूत करायची आहे, असे जथ्यासमोर सांगितले. त्यांना भारताबरोबरचा व्यापार वाढवून आर्थिक संबंधसुद्धा मजबूत करायचे आहेत. मरियम नवाझ शरीफ यांनी ही पण आठवण करून दिली की, 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दोन देशांमध्ये संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वर्षी मरियम नवाझ शरीफ यांच्या मुलीचे लग्न होते, ज्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरमध्ये खास दाखल झाले होते आणि असे वाटत होते की, दोन्ही देशांचे संबंध सुधारतील, परंतु त्यानंतर पुढच्या दहा दिवसांच्या आत पाकिस्तानी सैन्याने जम्मू विमानतळावर ड्रोनचा हल्ला करून दोन्ही देशांमधले संबंध बिघडवले.

पाकिस्तानमध्ये काही विद्वानांचे असे मत आहे की, पाकिस्तानी मुस्लिमांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱया शिखांवर हल्ले करून त्यांना भारतात पाठवायची चूक केली. शिखांचा वापर भारतातील हिंदू आणि शीख यामध्ये दरी निर्माण करण्याकरिता व भारताला तोडण्याकरिता करता आला असता. अर्थात हे विद्वान विसरतात की, शीख धर्माचा उदय भारतातील हिंदूंचे रक्षण करण्याकरिताच झाला होता.

मरियम नवाझ शरीफ यांनी स्वतःला एक पंजाबी म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करून भारतातील पंजाबच्या जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु हे नक्की आहे की, नवाझ शरीफ यांचे लक्ष हे कश्मीर मुद्दय़ावरून कधीच हटणार नाही. एक कारण असे आहे की, नवाझ शरीफ यांच्या पत्नी एक कश्मिरी भट होत्या.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचलेली आहे. एकीकडे पाकिस्तानात महागाईने कहर केलेला आहे, दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादानेही नागरिक त्रस्त आहेत. महागाई दरही 25 टक्क्यांपलीकडे आहे. एशियन डेव्हलेपटमेंट बँकेच्या आकडेवारीनुसार, आशिया खंडातील पाकिस्तान हा राहणीमानाचा खर्च न परवडणाऱया देशांत पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही केवळ 1.9 टक्के इतक्या कासव गतीने वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला 24 व्यांदा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज देणार आहे आणि हे कर्ज मिळवण्याकरिता पाकिस्तान एक लोकशाही पाळणारा मवाळ देश आहे हे सिद्ध करत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी सैन्य नवाझ शरीफ यांना भारताबरोबर आपले संबंध सुधारायला सांगत आहे.

भारतामधील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील का? पाकिस्तान भारताविरुद्धचे आक्रमक धोरण बदलेल का? पाकिस्तानमधले दहशतवादी निर्माण करायचे कारखाने बंद केले जातील का? पाकिस्तान भारताविरुद्ध सध्या चालू असलेला अफू, गांजा, चरसचा दहशतवाद थांबवेल का? पाकिस्तानचे सैन्य भारताबरोबर शांतता निर्माण करायच्या पक्षामध्ये आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानला आधी द्यावी लागतील. मात्र मरियम नवाझ शरीफ यांची कर्तारपूर गुरुद्वाराला भेट नक्कीच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या संबंधात एक महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे. कारण हे पाऊल उचलण्याकरिता नवाझ शरीफ, पाकिस्तानचे राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी सैन्य यांचा त्यांना नक्कीच पाठिंबा असावा.

भारताच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांनी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्राr, श्रीमती इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये पाकिस्तानशी भारताचे संबंध सुधारायचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आले. असे मानले जाते की, पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही बदलणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’ म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून भारताला कायमचे रक्तबंबाळ करत राहायचे’. हे धोरण बदलणार का? हा खरा प्रश्न आहे.

दहशतवादी टीटीपीशी घनिष्ठ संबंध असलेल्या अफगाण तालिबानचे पश्चिम सीमेवर पाकिस्तानला गंभीर आव्हान असूनही पाकिस्तानने भारताविरुद्ध पोसलेल्या दहशतवादी गटांना पोसणार नसल्याचे कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत. म्हणजेच पाकिस्तान अजूनसुद्धा भारताविरुद्ध लढण्याकरिता दहशवादी गटांना महत्त्वाचे सामरिक शस्त्र समजतो. पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल, परंतु सुरुवात तरी चांगली झाली आहे.