विज्ञान-रंजन – पाणी साठवणे…

पाऊस पडेल तेव्हा आणि पडेल तिथेच तो पकडण्याचं व साठवण्याचं धोरण व्यक्तिगत साठवणीपासून सरकारी जलसाठय़ांपर्यंत सर्वांनीच प्रत्यक्षात आणलं, तर दुष्काळ आटोक्यात आणणं शक्य होईल. अतिरिक्त जलसाठ्यातून जवळच्या अवर्षणग्रस्त प्रदेशाला नळांद्वारे त्वरित पाणी पाठवताही येईल. मात्र यासाठी जलसंचयाचे घरगुती ते सरकारी प्रयत्न यात समन्वय हवा. पावसाळा आता परतीच्या मार्गावर आहे. आपल्याकडे हस्त नक्षत्रात सूर्य गेला की, पाऊस माघारी जातो ही पूर्वापार अनुभवजन्य धारणा. त्यामुळे मृग ते हस्त अशी नऊ नक्षत्रं वर्षभरात सर्वात महत्त्वाची असं सुज्ञ एकेकाळी समजत असत. पर्जन्यवृष्टीचा हा काळ कमी नाही. कमीत कमी पाऊस पडला तरी ते पाणी साठवण्यासाठीच्या उपाययोजना केल्या तर पाण्यासाठी पायपीट करून विहिरींच्या तळाशी असलेले फार कमी पाणी शेंदण्याची, अनेकदा जीवघेणी वाटणारी कसरत करावी लागणार नाही. एकीकडे मुसळधार पावसाने ओला दुष्काळ आणि नगरं बुडवणारा महापूर, तर दुसरीकडे पाण्याचा ‘पिण्याला थेंबही नाही’ अशी जलविषमता निदान एकविसाव्या तंत्रज्ञानात पुढारलेल्या जगात तरी असायला नको…पण…

यासाठी पावसाळा आपल्याला किती पाणी देतो याची थोडी सर्वसाधारण माहिती असायला हवी. आपल्या देशात सरासरी 290 सें.मी. पाऊस होतो किंवा 115 इंच, परंतु पाऊस सगळीकडे सारखाच पडत नाही. अनेक भागांत ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही’ अशी यशवंत मनोहर यांच्या कवितेसारखी व्यापूळ अवस्था असते. मात्र पाणी पडतं त्या ठिकाणाहून ज्या गावात पाऊस जातच नाही किंवा केवळ हुलकावणी देतो तिथपर्यंत जमिनीखालच्या बोगद्यातून अथवा नळांमधून (पाइपमधून) पाणी पोहोचवणं सहजशक्य आहे. आता तर भूमिगत मेट्रोसाठी वापरली जातात तशी टनेल बोअरिंग यंत्र (टीवीएम) ठिकठिकाणी कार्यरत आहेत. मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यात अशा बोगद्यांचा समावेश आहे. 1860 पासून साडेचार फूट व्यासाचे नळ तानसा-वैतरणा या तलावांपासून मुंबईकडे पाणी नेत आहेत. तेही पम्पिंग केल्याविना! हे उदाहरण जगात महत्त्वाचं ठरलं आहे.

त्यामुळे राज्याच्या दुष्काळी भागात महाबळेश्वरसारख्या (जिथून पाच मोठ्या पूर्ववाहिनी नद्या उगम पावतात) ठिकाणाहून आणि गोदावरी नदीचा प्रवाह लक्षात घेऊन कोकणातलं अतिरिक्त पाणीही घाटमाथ्यावरच्या अवर्षणग्रस्त भागाकडे कसं वळवता येईल याचा विचार हवा. सोळाव्या-सतराव्या शतकात देशात अनेक ठिकाणी दूरवरून पाण्याचा प्रवाह भूमिगत पद्धतीने शहराकडे आणला गेल्याची उदाहरणे आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली प्राचीन नहर-ए-अंबरी योजना किंवा पुण्यातील उस्वास पद्धत ही त्यापैकी महत्त्वाची. आजही पाणी वाहून नेणाऱ्या या योजना दुरवस्थेत आहेत.

पाण्याची मोजणी करताना ‘क्युसेक्स’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. एखाद्या धरणात इतके क्युसेक्स जलसाठा होऊ शकतो किंवा काही क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला वगैरे, पण म्हणजे नक्की किती पाणी ते जनसामान्यांना कसं समजावं? वृत्तपत्रांनी बातमीसोबत जनप्रबोधनही सहजतेने करायला हवं. तर एक क्युसेक्स म्हणजे 1 अब्ज घनफूट किंवा अधिक सोप्या शब्दांत सुमारे 2831 कोटी लिटर पाणी धरणाच्या अतिरिक्त पाण्याचा क्युसेक्समध्ये विसर्ग होतो, तेव्हा सेकंदाला सुमारे 28 लिटर पाणी बाहेर पडतं. यावरून एका तासाचा हिशेब काढता येईल. अतिपाण्याने धरणभिंतीवर दाब वाढू नये यासाठी असा जलविसर्ग गरजेचा असतो. यासाठी धरणाला ‘स्पिल-वे गेटस्’ किंवा (स्वयंचलितही) दरवाजे असतात. अमेरिकेतील ‘हार्टवेल डॅम’चे अनेक दरवाजे उघडताना ते कसे क्रमाक्रमाने उघडतात ते पाहायला लोक सुरक्षित अंतरावर जमतात. अशी प्रॅक्टिकल स्टडी टूर किमान का@लेज विद्यार्थ्यांसाठी का नसावी! आपल्या देशात सुमारे 3200 लहान-मोठी धरणं आहेत. महाराष्ट्रातही पैनगंगा नदीवर इसापूर येथे पेंच नदीवर तोतलाडोह, भीमा नदीवर सोलापुरात उजनी, गोदावरी नदीवर, छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी, सातारा येथे कोयना नदीवर शिवसागर अशी मोठी धरणे आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या दृरदृष्टीमुळे राधानगरी धरण फार पूर्वीच अस्तित्वात आलंय. शिवाय खडकवासला, बारवी, पानशेत अशी अनेक छोटी धरणं आहेतच.

देशातलं सर्वात प्राचीन धरण तामीळनाडूत चोल राजांनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बांधल्याचं म्हटलं जातं. ते आजही जलसाठा करतं. कावेरी नदीवरचं हे कल्लानाई धरण आम्ही प्रवासात असताना पाहिलंय. ते पाहून हिंदुस्थानचा अंदाज घ्यायला आलेला मेकॉलेसुद्धा चकित झाला होता. हे धरण त्या काळाच्या मानाने खूप मोठं वाटतं. याशिवाय व्यक्तिगत पातळीवर फेरो सिमेंटसारख्या टाक्या जमिनीखाली (किंवा वरती) बांधून किमान पिण्याचं वर्षभराचं पाणी साठवता येतं. 10 ते 20 हजार लिटर पाण्याचा संचय केला तर एका पुटुंबाची तहान भागवेल. मोठ्या जलसाठ्यातून ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे सध्या प्रचंड बाष्पीभवन होतंय. परातीत पाणी ठेवून आपल्या भागातील बाष्पीभवनाचा अंदाज येतो. शिवाय धरणात गाळ साचण्याची समस्या आहेच. यावर सर्वसमावेशक विचार आणि उपचार करायला हवेत.

विनायक