लेख – मणिपूरः सैन्याच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

मणिपूरला सध्या केंद्र सरकारकडून प्रेमाचा आणि विश्वासाचा हात मिळण्याची गरज आहे. नैसर्गिक साधनसामग्रीचे वाटप हे हिंसाचाराचे मूळ कारण आहे हे लक्षात घेऊन आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच स्थानिक पातळीवर कुकी आणि मैतेईंदरम्यान संवाद सुरू करणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा मणिपूर प्रगत राज्य म्हणून पुढे येऊ शकेल.

मणिपूर विषयावर गेल्या महिन्यात अनेक लेख लिहिण्यात आलेले आहेत. या लेखांमध्ये मणिपूरच्या मैतेई, कुकी आणि नागांमध्ये चालू असलेला वाद, त्याची विविध कारणे यावरती लिहिण्यात आलेले आहे. अनेक टीव्ही चॅनेलवरती सल्ले देण्यात येत आहेत की, इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, शांतता यात्रा काढल्या जाव्यात. मैतेई, कुकी आणि नागांमध्ये संवाद व्हावा. मात्र आताच निवडून आलेल्या दोन नवीन खासदारांची आपल्या घराच्या बाहेर पडण्याचीसुद्धा हिंमत नाही.  सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे तिथे असलेली अराजकता, हिंसाचार थांबवणे. देशाची एकच संस्था परिस्थिती पूर्वपदावर आणू शकते, ती म्हणजे भारतीय सैन्य.

सुरक्षा दले, नेमकी परिस्थिती 

आज अनेक सुरक्षा दले मणिपूरमध्ये आहेत. त्यांची सध्या नेमकी परिस्थिती काय आहे? मणिपूर पोलीस आणि मणिपूर रायफल यांनी आपल्याकडे असलेली चार ते पाच हजार रायफल न लढता अराजकीय तत्त्वांना देऊन टाकली. त्यामुळे हे अतिरेकी एकमेकाला मारत असतात. आपली हत्यारे शत्रूला दिल्याची एकसुद्धा घटना गेल्या 50 वर्षांमध्ये भारतीय सैन्यात घडलेली नाही.

मणिपूर पोलिसांवरती तिथल्या जनतेचा विश्वास नाही. अनेक पोलीस आपल्या जातीजमातीप्रमाणे आपापल्या समूहांना मदत करताना, त्यांच्याबरोबर हिंसाचार करताना पकडले गेले आहेत.

पोलीस नेतृत्व कंट्रोल रूमच्या बाहेर जायला तयार नाही. धोकादायक परिस्थितीमध्ये पोलिसांचे नेतृत्व हवालदार करत आहेत. मोठय़ा संख्येने जी अर्ध सैनिक दले मणिपूरमध्ये आली आहेत त्यांचा उपयोग आक्रमक कारवाई करताना होत नाही. ही अर्ध सैनिक दले ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व वापरतात.

भारतीय सैन्याचे एक डिव्हिजन आणि आसाम रायफल मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले. आसाम रायफल हे एक पॅरामिलिटरी फोर्स आहे. मात्र याचे अधिकारी फक्त भारतीय सैन्यामधले असतात. त्यामुळे या दोन दलांमध्ये चांगले कोऑर्डिनेशन असते.

मणिपूरमध्ये झालेल्या सिझफायर करारामुळे शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रांबरोबर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथून अनेक शस्त्रे गायब झाली आहेत. ती परत आली पाहिजेत.

भारत सरकारने ‘अरामबाई टेंगगोलला’ या मैतेई उग्रवादी संस्थेच्या हिंसक कारवाया थांबवल्या पाहिजेत, तरच राज्यात शांतता निर्माण होऊ शकते. सध्या मैतेई गट हिंसाचार करतात आणि कुकी गट स्वतःचे रक्षण करतात. अनेक वेळा कुकी गटसुद्धा मैतेई गटांवरती प्रतिहल्ला करून बदला घेतात. कुकी आणि मैतेई जमातीमध्ये एकमेकाविषयी प्रचंड द्वेष आहे. मणिपुरी युवक स्वभावता आक्रमक असतात, चांगले सैनिक बनू शकतात, परंतु सध्या त्यांची शक्ती एकमेकांना मारण्यावरती खर्च केली जात आहे. हिंसाचारामध्ये महिलासुद्धा सामील आहेत. ज्यांना ‘मीरा पायबी’ म्हटले जाते. या महिला गटांनी आसाम रायफलच्या कंपनी बेसला अनेक ठिकाणी वेढा घातला आहे. ज्यामुळे आसाम रायफलच्या सैनिकांना आपल्या कॅम्पच्या बाहेर येणे कठीण होते. अनेक वेळा पकडलेल्या दहशतवाद्यांना ‘मीरा पायबी’ गटांनी घेरल्यामुळे भारतीय सैन्याला सोडून द्यावे लागत आहे. कारण बायकांवर फायर करणे सोपे नसते. ‘मीरा पायबी’चे भारतीय सैन्याच्या ऑपरेशनमध्ये अडथळे थांबवलेच पाहिजे नाहीतर सैन्य काम करू शकणार नाही.

अशा कठीण परिस्थितीवरती मात करून आसाम रायफल आणि भारतीय सैन्य तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे, अनेक शस्त्रे पकडत आहे आणि अनेक हिंसाचार करणाऱ्यांना पकडत आहे. ज्या भागामध्ये सर्वात जास्त हिंसाचार सुरू आहे व मणिपूरच्या डोंगरामध्ये सैन्याला तैनात करण्यात आले आहे. रोजच सैन्याची तिथे वेगवेगळय़ा प्रकारची ऑपरेशन्स सुरू असतात. सैन्याने आतापर्यंत 60 हजारांहून जास्त नागरिकांना हिंसाचारापासून वाचवले आहे. अनेकांना गाडीच्या मदतीने, हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. ज्या वेळेला हिंसाचार करणारा गट एखाद्या गावामध्ये येतो, सैन्य तिथे जाऊन त्याच्या विरुद्ध कारवाई करते. यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत.

मणिपूर खोऱ्यामध्ये आर्म फॉर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट हा लागू केला पाहिजे. ज्यामुळे सैन्याला आपली ऑपरेशन्स सक्षमपणे करता येतील.

डोंगराळ भागांमध्ये लोक वेगवेगळय़ा वस्त्यांमध्ये राहतात. कुठे 50 ते 60 घरे किंवा कुठे 100 ते 120 घरे एवढीच असतात. लांब पसरलेल्या डोंगराच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या जनतेला 148 कॉलम सैन्य पुरेसे नाही. तिथे असलेल्या सैन्याच्या कॉलमची संख्या दुप्पट करावी लागेल. अनेक राजकीय पक्ष, काही संस्था सल्ले देण्यामध्ये पुढे आहेत. त्यांना मणिपूरमध्ये स्थापन झालेल्या पिस कमिटीमध्ये पाठवले जावे आणि हिंसाग्रस्त भागामध्ये हातात शस्त्रे असलेल्या युवकांशी संवाद करायला भाग पाडायला पाहिजे. बहुतेक फक्त आपल्या समाजाच्या बाजूने बोलतात आणि दुसऱ्या समाजाला दोष देत आहेत.

परिस्थिती सुधारण्याकरिता काय करावे लागेल

मणिपूरचे पोलीस नेतृत्व आपल्या कामांमध्ये पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे. त्याजागी निधडय़ा छातीच्या सैनिकी नेतृत्वाची गरज आहे की, जे आपल्या सैनिकांबरोबर धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊन आपल्या सैनिकांचे नेतृत्व करतील आणि परिस्थितीला सामान्य करतील.

मणिपूर जनतेचा फक्त भारतीय सैन्यावरतीच विश्वास आहे आणि प्रत्येक वस्ती आमच्याजवळ सैन्याला तैनात करावे असे म्हणत आहे. सैन्याच्या दिमापूरस्थित 3 कोरच्या नेतृत्वाखाली सगळय़ा सुरक्षा दलांना आणले जावे आणि सुरक्षा दलांचा वापर कसा केला पाहिजे हे 3 कोरने ठरवावे. पुढचे काही दिवस मणिपूरमध्ये सैन्य वाढवून सीमा सुरक्षित केल्या पाहिजेत. ज्यामुळे नवीन शस्त्रे, दारूगोळा मणिपूरमध्ये येणार नाही. हिंसाग्रस्त भागांमध्ये शोधमोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्रे परत मिळवली पाहिजेत. कुठलाही गट जर शस्त्र घेऊन फिरत असेल तर त्यांना लगेचच फायरिंग करून निष्क्रिय केले पाहिजे. कुठल्याही शस्त्रधारी गटांबरोबर संवाद होऊ शकत नाही.