आमदार अपात्र होणार म्हणून तर राष्ट्रवादी फोडली, अनिल परब यांची टीका

आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्य न्यायालयाने जवळपास सर्व निकाल लिहून दिला आहे. फक्त सुनावणीचे काम अध्यक्षांना पार पाडायचे आहे. हे मिंधे सरकार पडणार याची खात्री असल्यानेच भाजपने राष्ट्रवादी फोडली असल्याचा दावा शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी केला ते आज पंढरपूर मध्ये आले होते.

उद्यापासून 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार असून सर्वोच्य न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जवळपास लिहून दिला असून फक्त सुनावणी अध्यक्षांकडे पाठविली आहे. त्यामुळे लवकरच याचा निकाल लागेल असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. आज पंढरपूरला दर्शनासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

सर्वोच्य न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे सगळी घालून दिली असून पूर्णपणे अर्थ लावूनच पाठविल्याने आता फक्त निर्णय घेणे बाकी असल्याचा टोलाही परब यांनी लगावला . सध्या ते वेळ काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्वोच्य न्यायालयाने राज्यपालांची भूमिका, घटनेतील 10 वे कलम या सर्व बाबतीत सांगितले असल्याने पक्षांतर्गत बंदी बाबत सर्व असलेले नियम आता स्पष्ट असल्याचे परब यांनी सांगितले . यामुळे सध्या सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा सुरु असून हे 16 आमदार अपात्र होणे म्हणजे सरकार जाणे आहे. या 16 आमदाराच्या मुख्यमंत्री असून यापाठोपाठ इतर 23 आमदारांचे पिटिशन देखील बाकी असल्याने हा वेळकाढूपणा सुरु असल्याचे परब यांनी सांगितले. आता सरकार वाचवण्यासाठी म्हणूनच राष्ट्रवादीतील लोकांचा पाठिंबा घेतला असावा असे परब यांनी सांगितले . आमच्या प्रमाणे राष्ट्रवादीनेही आता अपात्रतेसंदर्भात कारवाई सुरु केली असल्याचे परब यांनी सांगितले. सध्या उद्धव ठाकरे यांच्यावर सुरु असलेल्या टीका या ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे सुरु असून असे बोलण्यानेच त्यांचे त्यांच्या पक्षातील स्थान असल्याचा टोलाही परब यांनी राणे आणि वाघ याना लगावला.

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हत तर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखल देण्यासाठी असल्याचे परब यांनी सांगितले. मराठवाड्यातील मराठा समाजाला वंशवळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे अशी त्यांनी मागणी असल्याचे परब यांनी सांगितले. सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नसून यासाठी योग्य इम्परिकल डाटा मागास आयोगाने देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कुणबी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होत असून सामाजिक वातावरण खराब होऊ लागल्याने यात राजकारण न करता प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा परब यांनी व्यक्त केली .