Anil Deshmukh News : तर उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले असते, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांनी खोटे प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, हे प्रतिज्ञापत्र जर मी तयार केलं असतं तर उद्धव ठाकरे यांचं सरकार तेव्हाच कोसळलं असतं असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मिरजचे समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं. कदम एकदा माझ्याकडे एनव्हलप घेऊन आले. आणि म्हणाले याचे मला तुम्ही प्रतिज्ञापत्र करून द्या. या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवारसह अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे. आणि त्या खोट्या आरोपांवर मी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव
आणला, असा आरोप देशमुखस यांनी केला. तसेच सुमित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. सुमित कदम साधा नगरसेवकही नाही, तरी फडणवीसांनी त्याला व्हाय सुरक्षा दिली आहे. कदम एवढा कामाचा माणूस आहे का की सरकारने त्याला व्हाय सुरक्षा दिली? असा सवाल देशमुखांनी विचारला.

सांगली मिरजमध्ये चौकशी केली तर तुम्हाला कळेल फडणवीस आणि कदम यांच्यात काय संबंध आहे? फडणवीसांनी दिलेल्या मुद्द्यांवर जर मी प्रतिज्ञापत्र दिले असते तर आता उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत सापडले असते, आदित्य ठाकरेंना यांनी विनाकारण अडकवलं असतं. जेल मे जाओ या बीजेपीमे आओ असे त्यांचे धोरण होते. माझ्यावर हा प्रयोग जमला नाही म्हणून एकनाथ शिंदेंवर प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजित दादांवर झाला तो यशस्वी झाला. माझ्यावरचा प्रयोग यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं असेही देशमुख यांनी नमूद केले.