… काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा! गणवेशावरून अंबादास दानवे यांचा शिक्षण मंत्र्यांना टोला

विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक हजार कोटींच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणा हे मिंधे सरकार करत आहे. यातीलच एक शाळेची पहिली घंटा वाजताच पहिल्याच दिवशी पालिका तसेच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा या खोके सरकारने केली होती. मात्र या घोषणेचे तीन तेरा वाजले असून 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देणाऱ्या मिंधे सरकारची सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोलखोल केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका शालेय विद्यार्थ्याचा फोटो शेअर करत त्याच्या गणवेशावरून शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना धारेवर धरले आहे. या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री जी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

शाळा सुरू होऊन सहा महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मात्र मिळालेले नाही. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, असे यावेळी अंबादास दानवे म्हणाले.