मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करण्यासाठी अर्धवट कामांची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटने, आदित्य ठाकरेंकडून मिंधे-भाजपवर घणाघात

मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करण्यासाठी कामांना कोणतीही मंजुरी नसताना, कंत्राटदार नेमला नसताना कोटय़वधीच्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या आणि पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटने करून मुंबई-महाराष्ट्राची लूट करण्याचा प्रकार मिंधे-भाजप सरकारकडून सुरू असल्याचा घणाघात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. 5 ऑक्टोबर रोजीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते अशाच प्रकारे 14 कोटींच्या गायमुख-भाईंदर मार्गाचे भूमिपूजन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेऊन मिंधे-भाजपच्या कारस्थानांची पोलखोलच केली. पंतप्रधानांच्या हस्ते गायमुख-भाईंदर रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. या मार्गासाठी पीएमना ठाण्यात नेणार. मात्र या मार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. सॉलिड टेस्ट झालीय का? जिओ टेक्निकल सर्व्हे झालाय का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. दोन वर्षांपूर्वी 18 जानेवारीला पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन वर्षांत सिमेंट-काँक्रीटचे रस्ते करून मुंबई खड्डेमुक्त होण्याची घोषणा करण्यात आली, मात्र मुंबईत अजूनही जागोजागी खड्डेच खड्डे दिसत आहेत. मुंबईसह ठाणे, नाशिक, नागपूर, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हीच स्थिती असल्याचे ते म्हणाले. ही कामे का झाली नाहीत याची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.

लुटायला गेलात तर सोडणार नाही!

2017 मध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले, मात्र हे काम सुरूही झाले नाही. फक्त खर्च वाढला. अशी कामे करून मिंधे-भाजपला नक्की काय साधायचे आहे? मेट्रो कामांचे खर्च वाढले, पण कामे पूर्ण झाली नाहीत. मात्र याद राखा, आमचे सरकार आल्यावर चौकशी होईल.  तुम्ही महाराष्ट्र लुटू नका, लुटायला गेलात तर सोडणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

पंतप्रधानपदाच्या ‘गरीमे’ला धक्का

साध्या इमारतीचे उद्घाटन करायचे असले तरी सर्व प्रकारच्या परवानग्या आहेत का याची खातरजमा पीएमओ कार्यालयाकडून केल्यानंतरच पीएम येतात, मात्र आता तसे काही होताना दिसत नाही.  दोन वर्षांपूर्वी सहा हजार कोटींच्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. यातील फक्त नऊ टक्केच कामे पूर्ण झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आलेय. त्यामुळे अशा प्रकारे अर्धवट कामांचे भूमिपूजन, उद्घाटने करण्याची घाई का करता, असा सवाल करीत यामुळे ‘पंतप्रधान’ या पदाच्या ‘गरीमे’ला धक्का पोहोचत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

z गायमुख ते भाईंदर या मार्गासाठी 13 सप्टेंबर रोजी 14 हजार कोटींचे टनेल टेंडर काढण्यात आले. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे लागतील. मात्र इतक्या मोठय़ा कामासाठी केवळ 20 दिवसांचे शॉर्ट टेंडर कसे काढले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यासाठीच हे शॉर्ट नोटीसचे टेंडर काढल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

z ठाणे ते बोरिवली टनेलच्या कामासाठी वेस्ट इंडीजच्या बँकेची गॅरंटी कशी काय दिली? या बँकेला आरबीआयने परवानगी दिलीय का? ज्या कामांमध्ये आर्थिक अनियमितता आहे, पंतप्रधानांनी अशा कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करणे किती योग्य आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.