1080 एकर जमीन महायुतीने फुकट अदानीच्या घशात घातली, 50 हजार कोटींचा फायदा; आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

अदानी मुंबईत सात लाख स्केअर फुट बांधकाम करतील आणि त्यातून एक लाख कोटी रुपये कमावतील असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच 1080 एकर जमीन सरकारने फुकट अदानीच्या घशात घातली, त्यातून 50 हजार कोटींचा फायदा होणार आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेद आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकर येताच आमचे तीन प्राधानक्रम असतील ते म्हणजे नोकऱ्या, नोकऱ्या आणि नोकऱ्या. कारण रोजगारही महाराष्ट्रातून इतर राज्यात हलवले आहेत. काल आचारसंहित लागली. आणि मी म्हणालो होतो जोपर्यंत अदानीसंबंधित जीआर निघत नाहीत तोवर आचारसंहिता लागणार नाही. काल आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठा भुखंड अदानी समुहाला देण्यात आला होता. गेल्या दोन ते तीन महिन्यांत लोकसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये काही बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीत सरकारने दाखवलं की आम्ही जनतेला काही देत आहोत. आधी पंधरा लाख सांगितले आणि आता पंधराशे रुपये देत आहेत. चुकून सरकार आले तर पंधरा रुपये देतील अशी ती लाडकी बहीण योजना. या सरकारने मुंबईच्या प्रवेशाजवळ असलेल्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांवरचा टोल माफ केला. पण याच निर्णयाच्या आडोशातून खोके सरकारने भयानक गोष्टी केल्या आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारने निर्णय घेताना जरी सामान्य माणसांना 50 रुपयांचा दिलासा करून दिला असला तरी अदानी समुहाला 50 हजारो कोटी रुपयांचा फायदा अदानी समुहाला दिला आहे. 300 एकर जागेत धारावी पसरलेली आहे. धारावी पुर्नविकासासाठी अदानीला जो भुखंड देण्यात आला आहे तो 540 एकरचा भुखंड देण्यात आला आहे. त्यानंतर मिंधे सरकारने अदानीला कुर्ल्यातील 21 एकर जमीन, मुलुंड, भांडूप आणि कांजूरमधली 255 एकर जमीन, मढ मधली 140 एकर आणि देवनारचा 124 एकर जमीन मोफत देण्यात आली आहे. अशा प्रकारने सरकारने 1080 एकर जमीन सरकारने अदानीच्या घशात फुकट घातली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एवढे वर्ष प्रयत्न करून मुंबई गुजरातला त्यांना जोडता आली नाही. मुंबई जिंकू शकत नाही आणि मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानीला देऊन टाकल्या. हे लोक अरबी समुद्राचे नावही अदानी समुद्र करतील.
देवनार जमिनीनवरून राज्य सरकार आणि महानगरपालिकेमध्ये वाद आहे. हा वाद कोर्टातही गेला होता. एवढी जमीन धारावीची घेतल्यानंतर प्रत्येक धारावीकरांना घर मिळणार आहे का? तर तसेही नाही. कारण जर तुम्ही कंत्राटाचे कागद पाहिले तर त्यातील अपात्र होणाऱ्या कुटुंबांची संख्या दीड लाख इतकी आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत घेतलेल्या जमीनींवर हे लोक सात लाख स्के.फुटाचं हे बांधकाम करणार आहेत. महिलांना दीड हजार रुपये आणि टोलवर 50 रुपयांची सवलत मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी साई बाबांच्या मुर्त्या झाकल्या होत्या. कारण साई बाबा म्हणायचे की सबका मालिक एक है. भाजपला आणि एकनाथ शिंदेंचा याला विरोध आहे कारण सबका मालिक अदानी है.

जर मुंबईत सात लाख स्के. फूट जर यांनी बांधकाम केलं. तर अदानी समुह यातून एक लाख कोटी रुपये कमावतील. मुंबईत येऊन पैसे कमावण्याला आमचा विरोध नाही. पण मुंबई लूटून चालणार नाही. म्हणून महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला आहे की आमचं सरकार आलं तर अदानीला जे काही अतिरिक्त दिलं आहे ते रद्द करणार.

कुणालाही अपात्र न करता जर धारावीचा विकास होत असेल तर आमचा विरोध नाही. पण कंत्राटाच्या बाहेर जाऊन जर काम होत असेल तर हे कंत्राटच रद्द करा. आमची तर मागणी आहे वांद्र्यात रेक्लमेशनचा जो प्लॉट तिथे अदानीने ट्रान्झिट कॅम्प बांधावा.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुलुंडच्या एका आमदाराने वचन दिले होते की अदानीला दिलेली जमीन आम्ही रद्द करू. रद्द केली का? हे भुखंड रद्द केलेच नाही उलट आणखी भुखंड दिले गेले. ही लूट का सुरू आहे. जर अशाच प्रकारे अदानीला जमीन देत गेले तर आपल्याला इथे रहायलाही जागा मिळणार नाही. स्वाभिमानी मुंबईकराने विचार केला पाहिजे की ही देशाची प्रगती आहे की अदानीची प्रगती आहे.

फोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती आहे. आता निवडणूक होऊ घातली आहे. भाजप जाती जातीत, जिल्हा जिल्ह्यात आणि हौसिंग सोसायटीतही भांडणं लावतील. त्यानंतर जल, जंगल, जमीन आणि अगदी समुद्रही अदानीच्या घशात घालतील.

आमचे सरकार आले तरी आम्ही लाडकी बहीण योजना सुरूच ठेवू. टोलचा निर्णय आम्ही मागे घेणार नाही. लाडक्या बहि‍णींना पैसे देण्यासाठी आम्ही महायुतीच्या लाडक्या कंत्राटदारांचे पैसै बंद करू. अदानाला एवढी जमीन देऊ केली आहे. अदानींनी बड्या बँकेकडे ही जमीन गहाण ठेवून पैसे उभे केले तर? गेली दोन वर्ष यांचं सरकार आहे मग लाडकी बहीण आताच का आठवली? टोल माफी आताच का झाली? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.