अंबाजोगाईजवळ भीषण अपघात; चाकूरचे चार जण जागीच ठार

अंबाजोगाई-लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात स्विफ्ट कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. हे सर्व जण लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत.

शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. प्रवासादरम्यान सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई-लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ पहाटे एक वाजेच्या सुमारास त्यांच्या कारची आणि समोरुन येणार्‍या कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लातुरच्या चाकूर तालुक्यातील जगळपूर येथील माजी सरपंच तथा बाजार समितीचे संचालक बाबुराव (माधव) व्यंकटराव खलंग्रे (58), आत्माराम माधवराव बानापुरे (54), सौदागर किसन कांबळे (50) आणि शिवराज शंकरराव डोम (51, रा. बालाजी मंदिरजवळ, लातूर) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहायक फौजदार बीडगर, हेड कॉन्स्टेबल शेख व इतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चालकांना समोरुन येणार्‍या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आला आहे. अचानक निमुळत्या झालेल्या या रस्त्याने आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरी करावा अशी मागणी पुन्हा जोर धऊ लागली आहे.