मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेला करा, आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या सहा महिन्यांपासून दोन ते तीन दिवस उशीराने होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना एक पत्र लिहून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

”मुंबई महापालिका आस्थापनेत जवळपास नव्वद हजार कामगार, कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असून, जवळपास एक लाख तेरा हजार सेवानिवृत्त निवृत्तीवेतन धारक आहेत. या सर्वांना सहा महिन्यांपूर्वी नियमीतपणे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पगार त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत असे. परंतु आता 1 ऐवजी 2 किंवा 3 तारखेला जमा होत असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज अथवा इतर कर्जाचे हफ्ते 1 तारखेला वळते होत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई होत आहे. मागील अडीच वर्षाहून अधिक कालावधी महाराष्ट्रातील अनेक महापालिका लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासना मार्फत चालवले जात आहे. कोविडच्या कालावधीत सर्व यंत्रणा ठप्प असताना फक्त महापालिका कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करीत होते. त्यांचा कोविड योद्धा म्हणुन गौरव देखील करण्यात आला होता. शिवाय तत्कालीन महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिदिन प्रत्येकी 300/- प्रोत्साहन भत्ता देखील दिला होता. परंतु सध्या अस्तित्वात असलेले सरकार पालिकेचा निधी अनावश्यक ठिकाणी खर्च करून कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक कामासाठी राखून ठेवलेला निधी (FD) मोडण्याचा विक्रम करीत आहे. या निवेदनाव्दारे मी अशी मागणी करीत आहे की, मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी आणि अधिकारी तसेच निवृत्ती वेतन धारक यांचे पगार/वेतन दर महिन्याचा एक तारखेला मिळणेकरीता कार्यवाही करावी आणि वेतन धारकांना दिलासा द्यावा, असे आदित्य ठाकरे यानी गगराणी यांना लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.