बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आज पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांचीच बंदूक खेचून त्यांच्यावर गोळीबार केल्याने पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत हे सर्व प्रकरण संशय़ास्पद असल्याचे म्हटले आहे.
”बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील. पण या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि या लपवालपवीचा काही संबंध आहे का? याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. ह्या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2024
12 व 13 ऑगस्ट रोजी नराधम अक्षय शिंदे याने चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. पालकांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 11 तास लावले होते. याचा संताप म्हणून 20 ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक रस्त्यावर उतरले. आठ तास बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल कोर्टानेही घेतली.
नेमके काय घडले ?
बदलापूरमध्ये आदर्श विद्यालय ही भाजप आणि रा.स्व. संघप्रणीत शाळा आहे.
या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या साडेतीन आणि चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली स्वच्छतागृहात जात असताना शाळेतील अक्षय शिंदे या नराधम सफाई कर्मचाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 12 ते 13 ऑगस्ट रोजी घडली.
पोटात दुखत असल्याची तक्रार करत मुलींनी घडलेला घृणास्पद प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी शाळेत धाव घेतली, परंतु शाळा व्यवस्थापनाने त्यांना दाद दिली नाही आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे गाठले, मात्र तेथेही पोलिसांनी त्यांना राजकीय दबावाखाली अनेक तास ताटकळत ठेवले. तुम्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करून आणा त्यानंतरच गुन्हा दाखल करू, अशी उर्मट उत्तरे पोलिसांनी पालकांना दिली.
पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या शहर संघटक दक्षता तांबे यांच्याकडे मदत मागितली. तांबे यांनी तत्काळ बालहक्क संरक्षण कक्षाला फोन लावून घडलेली घटना कळवली.
बालहक्क संरक्षण कक्षाच्या अधीक्षकांनी पोलीस आणि रुग्णालयाला याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची सूचना केली. त्यानंतर चिमुकलींची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
पालकांसह त्या चिमुकलींची अकरा तास झालेल्या फरफटीनंतर अखेर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याविरोधात 16 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे या स्वतः महिला असूनही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.