केदारनाथ धाम सोनं प्रकरण, बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार आणि अयोध्येतील भूखंड घोटाळ्यावर पंतप्रधान गप्प का? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

केदारनाथ धाम सोनं प्रकरण, वक्फ सुधारणा विधेयक, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि अयोध्येतील भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई आयोजित एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपच्या धार्मिक आणि जातीय राजकारणावर निशाणा साधला. भाजप असा पक्ष आहे जो सर्वधर्म समभाव फक्त लुटण्यावर विश्वास ठेवतो, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

वक्फ सुधारणा विधेयक हे संसदेच्या संयुक्त समितीकडे (JPC) पाठवण्यात आले आहे. हे विधेयक जेपीसीकडे पाठवावे, अशी मागणी ‘इंडिया’ आघाडीने केली होती. त्यानंतर ते जेपीसीकडे पाठवण्यात आले. पण भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो सर्वधर्म समभाव लुटीवर विश्वास ठेवतो. वक्फ बोर्डाचा मुद्दा आहेच त्यासोबतच केदारनाथ धामचेही प्रकरण मोठे आहे. केदारनाथ येथून जवळपास तीनशे किलो सोनं गायब केलं आहे, हे शंकराचार्यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजप उत्तर का देत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. यावर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री गप्प आहेत. ते ‘CAA’ वर बोलत होते. आश्रय देण्याच्या चर्चा करत होते, ते आता गप्प का आहेत? अयोध्येतही मंदिराच्या आजूबाजूची जमीन डिनोटीफाय झालेली आहे, ती हिंदूंचीच आहे. मग ही जमीन कोणाला दिली गेली? तिथे लोढा आश्रम बांधणार आहेत की कर्मशियल प्रॉपर्टी उभारणार आहेत, हे आधी सांगा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

वक्फ सुधारणा विधेयक लोकभेत मांडल्यावर विधेयक जेपीसीकडे पाठवावं, अशी आमची आधीपासूनच मागणी होती. आम्ही कोणावरही आणि कुठल्याही धर्मावर अन्याय होऊ देणार नाही. वक्फ बोर्डाचा जसा मुद्दा आहे, तशीच केदारनाथ धाम प्रकरणात आमची मागणी आहे. केदारनाथ धाम येथील सोन्याचं जे प्रकरण आहे यावर पंतप्रधांनी किंवा सरकारमधून कोणीही उत्तर द्यावं. तसेच बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यावरही पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि अयोध्येतही जे काही झालं त्यावरी सरकारने बोलावं, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.