महिलांचा आवाज दाबण्यासाठी मिंधेंची राजवट आणखी कुठल्या थरापर्यंत जाणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक जी ह्यांच्यावर स्वेच्छेने पायउतार होण्यासाठी आणि राज्यातील निवडणूक आयोगाचे प्रमुख बनण्यासाठी खूप दबाव टाकला जात आहे, असा आरोप केला आहे.

X वरील आपल्या अधिकृत पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की, मिळालेल्या माहितीनुसार, मदन जी 4 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत आणि भाजप-मिंधे सरकारकडून मुख्य सचिव सुजाता सौनिक जी ह्यांच्यावर स्वेच्छेने पायउतार होण्यासाठी आणि राज्यातील निवडणूक आयोगाचे प्रमुख बनण्यासाठी खूप दबाव टाकला जात आहे’.

आदित्य ठाकरे यांनी पुढे असा मुद्दा मांडला आहे की, ‘असे का? फक्त त्या एक अतिशय कर्तबगार स्त्री आहेत आणि भाजप-मिंधेना ते मान्य नाही म्हणून?’

‘त्या केवळ एक महिला आहेत म्हणून त्या पदापर्यंत पोहचलेल्या नाहीत, तर एक अधिकारी म्हणून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. अनेक दशके कर्तव्य बजावले आहे. त्या 30 जून 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. जर घटनाबाह्य CM त्यांची बदली करू इच्छित असतील तर ते तसा आदेश जारी करू शकतात. पण त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. पुढच्या वर्षी निवृत्त होणार असतानाही एका सक्षम अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची सक्ती का करावी? दबावास बळी पडण्यास त्यांना भाग पाडले जाईल का? महाराष्ट्रातील महिलांचा आवाज दाबण्यासाठी मिंधेची राजवट आणखी कुठल्या थरापर्यंत जाईल?’, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.