रेल्वेमंत्र्यांकडे भाषण आणि पक्षाचा प्रचार करायला वेळ आहे, पण प्रवाशांच्या समस्या सोडवायला नाही; वांद्रे दुर्घेटनेवरून जयंत पाटील यांचा हल्लाबोल

वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडताना वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र या दुर्घटनेची चौकशी करायला रेल्वे मंत्र्यांकडे वेळ नाहीय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. अशा दुर्दैवी घटना घडल्यावर रेल्वे मंत्री मुंबईत आल्यावर त्य़ांनी मुंबई रेल्वेच्या कार्यालयात जाऊन या सगळ्या गोष्टीची चौकशी करायला पाहिजे होती. या गोष्टी पुन्हा होणार नाहीत यासाठी काळजी घेण्याचे आदेश देणं आवश्यक होत. पण ते न करता महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये राजकारण करण्यासाठी रेल्वेमंत्री येतात. भाषण करायला आणि पक्षाता प्रचार करायला त्यांच्याकडे वेळ आहे पण प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच खात्याच्या मंत्र्याना वेळ मिळत नाही, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातावरून सरकारला धारेवर धरले आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अशी पहाटेची गर्दी देखील सरकारला सांभाळता आली नाही. या सरकारचं आणि दिल्लीच्या सरकारचं लक्ष फक्त बुलेट ट्रेन सारख्या मोठ्या प्रकल्पांकडे आहे. आज वांद्र्यात झालेली ही चेंगराचेंगरीत मुंबईतल्या सामान्य नागरिकांकडे हे सरकार किती दुर्लक्ष करतयं हे दिसून आलं. ही अतिशय चिंतेची बाब आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

मुंबईकर रेल्वेने प्रवास करत असताना त्यांची सुरक्षा बघणं हे सरकारचं अग्रकर्माने काम होतं. पण सरकारने याबाबत कायम दुर्लक्ष केलं. सकाळच्या, रात्रीच्या आणि इतर वेळीच्या रेल्वेच्या गर्दीबाबत योग्य नियोजन केल नाही तर असे प्रकार घडतात. हे माहित असूनही वांद्र्याला हा प्रकार घडला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांच्यावर ही जबाबदारी त्या सरळ्यांचा निषेध करतो. असे म्हणत त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

श्रीमंतानी लक्झरी ऐश्वऱ्यात जगाचयचं, महाग तिकिट काढून रेल्वेने आणि विमानाने प्रवास करायचा पण जो साध्या रेल्वेत प्रवास करतो त्याने मात्र चेंगराचेंगरिला तोंड द्यायचं. ही आज मुंबईकरांची झालेली अवस्था फक्त मुंबईतच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात लोक अनुभवतायत. श्रीमंतांचे चोचले करणारे हे सरकार सतत महाराष्ट्रातल्या जनतेकडे दुर्लक्ष करतय हे आता जनेतेने लक्षात घेऊन उद्याच्या निवडणुकीत आपली प्रतिक्रिया देईल. असा ठाम विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.