भाजप सरकारचे Reel मंत्री जागे होणार आहेत का? रेल्वेचे व्यवस्थापन आहे कुठे? विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडताना वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. असे असतानाही रेल्वेमंत्री काय करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजप सरकारचे Reel मंत्री जागे होणार आहेत का? रेल्वेचे व्यवस्थापन आहे कुठे? असे संतप्त सवाल त्यांनी केले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत भाजप सरकारला जाब विचारत रेल्वेमंत्र्यांना फैलावर घेतले आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुंबई मधील वांद्रे रेल्वे स्थानकावर आज झालेल्या चेंगरा चेंगरीत 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. आता तर रेल्वे स्थानकावर सुद्धा अपघात व्हायला लागले आहे. भाजप सरकारचे Reel मंत्री जागे होणार आहेत का? सणानिमित्त आपल्या घरी जाणाऱ्या लोकांवर काय वेळ आली आहे? रेल्वेत सीट राहिली बाजूला… येथे ट्रेन पकडणे सामान्य प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. रेल्वेचे व्यवस्थापन आहे कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे.

वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यात 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची फलाटवार गर्दी झाली होती. याच गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.