भाजपने द्वेषाच्या मर्यादा ओलांडल्यात, सातत्याने केजरीवालांना मारण्याचा होतोय प्रयत्न; आपचा खळबळजनक दावा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ला झाला होता. या घटनेनंतर आपने भाजपवर हल्ला चढवला आहे. आता भाजपने द्वेषाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजप अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही, हे त्यांना समजले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना ठार मारण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे, असा खळबळजनक दावा आपने केला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी हा आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात याला. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप संजय सिंह यांनीही भाजपवर निशाणा साधला. तुमच्यात नेमका द्वेष तरी किती आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. कितीही द्वेष असला तरी तुम्ही केजरीवाल यांना हरवू शकत नाही. म्हणूनच तुम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहात, असे संजय सिंह म्हणाले.

अरविंद केजरिवालांवर झालेल्या या हल्ल्यात अमित शहा यांच्या गृहखात्याचा आणि पोलिसांचा हात आहे. पोलिसांसमोर हा हल्ला झाला, त्यामुळे कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. सुरक्षेतील ही चूक कशी झाली? असा प्रश्न यावेळी संजय सिंह यांनी उपस्थित केला. अरविंद केजरीवाल कुठेही गेले तरी ते हल्ला करतील. अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न केला. जर केजरीवाल यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी भाजपच जबाबदार असेल, असेही संजय सिंह म्हणाले.