अभिप्राय – अभिव्यक्तीचा मुक्ताविष्कार

> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

मी आता गप्प बसणार नाही…,
कवितेच्या वाटेला गेल्याशिवाय राहणार नाही…!!

असं ठामपणे सांगून ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन टिळेकर यांनी ‘कवितेच्या वाटेला…’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून सामाजिक दंभावर प्रहार केला आहे. टिळेकर यांनी आजवर वैज्ञानिक, वैचारिक, ललित या साहित्य प्रकारात एकूण 22 पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांनी विनोदी कथा, शृंगारिक कथा, एकांकिका संग्रह, विनोदी लेख संग्रह यांसारख्या साहित्याच्या माध्यमातून विविधांगी लिखाण केले आहे. काव्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रथमच पदार्पण केले आहे. समाजातील वाईट तसेच कालबाह्य रूढी परंपरा, वेडगळ समजूती यांवर त्यांनी आपल्या कवितेतून आसूड मारले आहेत.

टिळेकर यांचा मुळचा पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. त्यांनी आपल्या दीर्घ व सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीचा मुक्ताविष्कार ‘कवितेच्या वाटेला…’ मधून मांडला आहे. त्यांनी मार्मिकपणे सामाजिक दंभावर बोट ठेवले आहे. यातील सर्व कविता मुक्तछंदातील आहेत. या कवितांमधून समाजातील प्रश्न मांडले आहेत.
चांदणं सुखाचं असलं,
तरी ते सूर्याचं उसनं असतं,..
दुसऱयाला प्रकाश देणं, हेच तर खरं जिणं असतं
यांसारख्या सकस विचारांची ते पानोपानी पेरणी करतात.
टाळ, मृदुंग, प्रवचन, धर्म, योग, सिध्दी, मोक्ष, परमार्थ, साधना, उपासना, ईश्वर, विधाता, नामस्मरण, सनातन, परंपरा या धार्मिक आणि अध्यात्मिक बाबींचा उहापोह करीत टिळेकरांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रधर्म, त्याग, समर्पण, शौर्य, संस्कृती, संस्कार, अस्मिता, लढा यांचे अनन्यसाधारण महत्वही विषद केले आहे. सद्यस्थितीत समाजस्वास्थ्य बिघडवणारी खंडणी, वर्गणी, खून-खराबा, चाकू-सुरी, दादा, भाई, नेता, राडा या सारख्या बाबींची दाहकता व्यक्त केली आहे.

‘बा तुकोबा’ या कवितेत ‘हवा तुझा विचार -सोटा, हाणाया खोटय़ांचा माथा.’ या शब्दात तुकोबारायांच्या विचारांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. ‘डबकं‘ या कवितेत ज्योतिबा, सावित्री, रं.धो.कर्वे, गाडगेबाबा यांचे विचार कसे आज पायदळी तुडवित आहेत, याचा परामर्श घेतला आहे. उद्याच्या मातांनो, पिसाटलेले दुःशासन, रघुनाथ धोंडो कर्वे यांसी, एक जळण जळणं, तुझे हात, सावित्रीच्या लेकी, आई बहिणाई, महाराष्ट्राचे शिल्पकार, पुण्यात दिसल्या सावित्रीबाई!, या कवितेतून स्त्राr शिक्षण व स्त्रियांच्या समस्या याविषयीचे मूलगामी विचार मांडले आहेत. आम्ही आणि ते, पळा पळा कोण पुढे पळेतो ते, दार उघड बये विज्ञानेश्वरी, आळंदीची भिंत, पालथी घागर या कवितेत अंधश्रद्धा, तीर्थयात्रा, पूजाअर्चा, नवस सायास, कर्मकांडे यासंदर्भात कवींने पोटतिडकीने लिहिले आहे.

कवी डॉ. महेश केळुसकर यांची छोटेखानी प्रस्तावना आहे. ते म्हणतात,‘ग‘ लिहायला जावं तर गर्व धर्माचा थैमान घालत येतो. अशी नवी बाराखडी प्रचलित झालेली पाहून कवी अस्वस्थ होतो. आपलीच घरे भरणारे लोक महत्वाकांक्षांची शर्यत लावताना पाहून हताश होतो, पण जोवर कवीच्या जीवात जीव आहे तोवर तो सनातनी डबक्यांवर हल्ला करत राहणार…!’ हे टिळेकर यांच्या सामाजिक प्रबोधनातील योगदान मौलिक असल्याचं जणू प्रशस्तीपत्रच देतात. टिळेकर यांच्या कविता या वास्तववादी सामाजिक ऊर्मीतून आल्या आहेत, हे अधोरेखित होते.

कवितेच्या वाटेला
कवी : चंद्रसेन टिळेकर, मुंबई पृष्ठे : 92
प्रकाशक : सायली क्रिएशन्स मूल्य : 100/-