पाणी उकळून, गाळून प्या! पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी

भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांमध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे 21 ऑक्टोबरपासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जल अभियंता खात्याकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र खबरदारी म्हणून मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्रोतांपैकी भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गत 3 ते 4 दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱया पाण्याची गढूळता 21 ऑक्टोबर 2024 पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे. यातच मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत.