सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्याचा फटका महायुतीला बसला होता. तसेच विधानसभा निवडणुकीपुर्वी मराठा समजाला आरक्षण देण्याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला अनेकदा इशारा दिला होता. आता निवडणुका जाहीर झाल्याने पाडायचं की लढायचं याबाबत जरांगे भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. आता जरांगे यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, असे ठणाकावले आहे.

अनेक राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बैठक घेतली आहे. तसेच समजातील अनेकांच्या भूमिकाही ते समजून घेत आहे. त्यानंतर निवडणुकीत ते पाडापाडीची भूमिका घेतात की निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवार, राजकीय तज्ञांशी चर्चेनंतर जरांगे त्यांची भूमिका रविवारी जाहीर करणार आहेत. मराठा आरक्षणाची निवडणुकीबाबत भूमिका काय राहणार याबाबत रविवारी बैठक असून बैठकीतच निर्णय घेईन असे जरांगे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षण कसे देत नाहीत बघूच… सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही,असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

आमच्या आनंदात विष कालवण्याचं काम केलं. आमच्या लेकराच्या काळजावर यांनी आरक्षण न देऊन वार केलेत. आमच्या हातातोंडाशी आलेला घास होता. आमचा हातही छाटला आणि घासही काढून घेतला. देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकार नसताना आमच्या लेकरांच्या माना त्यांनी पिरगळल्या आहेत. जाता जाता आम्हाला खुन्नस देऊन आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिलं नाही. सरकारची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. सरकारने आमची घर उन्हात बांधली आहेत. त्यांना सत्तेत बसायचं आहे. त्यांना मारामाऱ्या भांडण लावायचे आहेत. योजना आणायच्या. त्यांच्या या क्रूरपणाचा शेवट मराठे करणार, असं जरांगे म्हणाले. आमची भूमिका बैठकीत ठरवू असेही ते म्हणाले. हे कसं आरक्षण देत नाही ते दाखवतोच. निर्णय बैठकीतच सांगेन असं जरांगे म्हणाले.