मशिदीत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत! कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत

मशिदीत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मशिदीत घोषणा देणार्‍या आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या वर्षी दक्षिण कन्नड जिल्ह्यात दोन जण मशिदीत शिरले. मशिदीत जाताच या दोघांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर भादंविच्या कलम 295 (अ), कलम ४४७ आणि कलम 506अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. कलम 295 हे धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित आहे. ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्यामुळे कुणाच्या भावना कशा दुखावतील, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार प्रत्येक कृती ही कलम २९५ (अ) चे उल्लंघन होऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपींविरोधात पुढील कारवाईचे आदेश म्हणजे कायद्याचे उल्लंघन ठरेल, अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली.