महावितरण गुजरात चरणी वाहण्याचा सत्ताधार्यांचा खेळ, कोट्यावधींच्या कर्जावरून अंबादास दानवेंचा हल्लाबोल

राज सरकारच्या विद्युत वितरण कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. वीज ग्राहकांच्या बिलांची तब्बल 93 हजार कोटी, कृषी ग्राहकांची 70 हजार कोटींची थकबाकी, दुसरीकडे 86 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा यामुळे महावितरणची ‘पॉवर’ जाण्याच्या मार्गावर आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

अंबादास दानवे यांनी महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातीस महायुती सरकारने महावितरणाचा कडेलोट करण्याचे ठरवलेच आहे. सध्या 86 हजार आठशे कोटींचा कर्जाचा बोजा आणि त्यापेक्षा अधिक थकबाकी असल्याने महावितरण अडचणीत आहे. कॅश फ्लो नीट नसल्याने महावितरण खुल्या बाजारातून वीज घेण्यास असमर्थ ठरत आहे. असे दानवे यावेळी म्हणाले.

राज्यावर लोडशेडिंगची टांगती तलवार

कोरोनानंतर हावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी महावितरणने मोठय़ा प्रमाणावर कर्ज घेतले आहे. याप्रश्वभूमीवर राज्य सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये पत्र पाठवून महावितरण कंपनीला देय असलेल्या अनुदानाची रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे. ‘कॅश फ्लो नसल्यामुळे महावितरण खुल्या बाजारातून वीज विकत घेऊ शकत नाही.लोडशेडिंगची तलवार म्यानेतून बाहेर निघताच, अदानी सारखे खासगी पुरवठादार महावितरण गिळण्यास आ वासून आपल्याला महाराष्ट्रात उभे ठाकलेले दिसतील. मग लॉस दाखवून महावितरण गुजरात चरणी वाहण्याचा सत्ताधाऱ्यांचा खेळ सुरू होईल. असा हल्लाबोल यावेळी अंबादास दानवेंनी केला.