पंतप्रधान मोदींकडून बंजारा समाजाची फसवणूक, काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंजारा समाजाची फसवणूक केली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीत मोदींचा बंजारा समाजाच्या एकगठ्ठा मतांवर डोळा आहे असेही नाना पटोले म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीसुद्धा केली आहे.

एकेकाळी बैलाच्या पाठीवर माल लादून व्यापारासाठी मुलुखभर भटकणारा हा समाज आता परिवर्तनाच्या दिशेने पावलं टाकण्याचा प्रयत्न करत आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असे लेखी आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे.

बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. पंतप्रधान मोदी जनतेशी तर खोटं बोलतातच पण आता साधू संतांशीसुद्धा खोटं बोलतात हेच यातून स्पष्ट झालं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाच्या एकगठ्ठा मतांवर मोदींचा डोळा आहे. पण, आता हा साधाभोळा बंजारा समाज मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही असेही पटोले म्हणाले.