अदानीच्या नावावरील दौलतीचे खरे मालक मोदी-शहा, त्यांच्यापासून महाराष्ट्राला धोका! – संजय राऊत

लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्यात तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही दौरे वाढले आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका असल्याचे म्हटले.

बुधवारी सकाळी माध्यमांनी मोदी-शहांच्या दौऱ्यांबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे. हा धोका काय आहे हे आपण गेल्या अडीच वर्षापासून पाहताय. मोदी-शहांना महाराष्ट्र, मराठी माणूस खतम करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी कणा मोडू काढायचा आहे.

महाराष्ट्राला मोदी-शहांपासून धोका आहे, ते वारंवार यासाठीच येताहेत की उरलासुरला स्वाभिमानही खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला ताब्यात घ्यायचे आहे. हे लपून राहिलेले नाही. महाराष्ट्राची इंच न इंच जमीन, महाराष्ट्राच्या संस्था आणि उद्योग हे अदानींच्या घशात घातले जात आहे. ही संपत्ती जरी अदानींच्या नावावर असली तरी त्याचे खरे मालक मोदी-शहा हेच आहेत. महाराष्ट्रावरील हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आहे, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपला स्वप्नदोष विकार जडलाय; 2024 ला 240 वर अडकले, 2029 ला 140 खाली जाणार! – संजय राऊत

दरम्यान, अमित शहा हे सह्याद्रीवर थांबलेले असून त्यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे ते बॉस आहेत. त्यांना भेटावेच लागेल, अन्यथआ ते नोकरीवरून काढून टाकतील.