दिल्लीत थैल्या पोहचवण्यासाठी राज्यात भ्रष्टाचार आणि लूटमार सुरू; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात मिंधे आणि त्यांच्या खुर्च्या पैशांच्या आणि खोक्याचा बळावर टिकून आहे. खुर्च्या टिकवण्यासाठी आणि सत्ता ठेवण्यासाठी त्यांच्याकडून राज्यात भ्रष्टाचार आणि राज्याची लूटमार सुरू आहे. राज्यात लूटमार करत ते दिल्लीत थैल्या पोहचवत आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राज्याचे नेतृत्व मिंधेकडे राहू नये, यासाठी आतापासूनच भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचा सर्व खर्च करा, असे आदेश दिल्लीतून मिंधे यांना देण्यात आले आहे. त्यांच्याकडून झारखंड आणि हरयाणातील निवडणुकीचा खर्चही वसूल केला जात आहे. हा खर्च केला तर राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे द्यायचे की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे मिंध्यांचे पद पैशांवर टिकून आहे. त्यासाठी राज्यात भ्रष्टाचार आणि लूटमार सुरू आहे. राज्यातील पैसे लुटून मुख्यमंत्र्यांना दिल्लीला थैल्या पोहचव्यावा लागत आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

पैशांच्या जोरावर यांच्या खुर्च्या टिकून आहेत. हे सर्व डबक्यातील बेडूक आहेत. डबक्यातून बाहेर येत डराव, डराव करणाऱ्यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही. बेडूक आणि गांडूळ हे फक्त पावसाळ्यात असतात. तसेच मिंधे गटाचे आहेत. ते आता एकमेंकावरच डराव, डराव करत आहेत. भविष्यात श्रीकांत शिंदे खासदार नसतील आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री नसतील, फक्त पैसे आणि खोके यांच्यावरच त्यांची सत्ता टिकून आहे, असेही संजय राऊत म्हणाले.