राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित; सत्यपाल मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मलिक मातोश्री वर आले होते. या भेटीवेळी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात मलिक यांनी प्रखर आणि ठाम भूमिका घेतली आहे. पुलवामा हल्ला, अदानी, अंबानी यासह महत्त्वाच्या विषयांवर वक्तव्य केल्यामुळे मलिक चर्चेत आले होते. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे. उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर मातोश्रीबाहेर आल्यावर मलिक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

राज्यातच नाही तर देशात भाजपचा सफाया निश्चित आहे. तसेच भाजपचा सफाया करण्यात उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.