अंबाजोगाई- लातूर मार्गावर नांदगाव पाटीजवळ भीषण अपघात; चाकुरमधील चौघांचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई-लातूर मार्गावर नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.

जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारने शनिवारी रात्री छत्रपती संभाजी नगरकडे जात होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू होता. अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ कार समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरखाली घुसल्याने कारचा चुराडा झाला. तसचे कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास झाला.

अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहा.फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज आला नाही. त्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आला आहे. अचानक निमुळता झालेल्या या रस्त्याने आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरी करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.