धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना पत्र

काल बुलढाण्यात वैतागलेल्या अजितदादांनी वाचाळवीरांना आवर घालण्याची मागणी केली होती. आता त्यांच्या गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राणे हे त्यांच्या सभांमधून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करत आहेत. यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. राणे यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रात केली आहे. राणे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीतीही आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

z वेडेवाकडे बोलून महायुतीच्या सरकारला संकटात आणू नका, असे खडे बोल अजित पवारांनी सुनावले होते. त्यांचा रोख मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड, भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्याकडे होता.