पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकरी सुभाष संपत जाधव यांचा 36 गुंठे ऊस जळाला आहे. प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील पांडुरंग वस्ती येथे गट नंबर 419 मध्ये शेतकरी सुभाष संपत जाधव यांनी एक वर्षापूर्वी आडसाली ऊसाची लागवड केली होती. या ऊसाच्या शेतावरून विजेच्या तारा जात होत्या. या तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने उभा ऊस डोळ्यादेखत जळाला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने या शेतकऱ्यांचा ऊस तोडला जाणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन या ऊसाचा पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.