मिंधेंनीच रडत रडत येऊन आम्हाला सांगितलं होतं; आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

मिंधेना भाजप अटक करणार होती, त्यांनीच रडत रडत येऊन आम्हाला तसं सांगितलं होतं. अटक टाळण्यासाठी मिंधे भाजपला शरण गेले, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी मिंध्यांच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला.

माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही, आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर हिंदुस्थान, पाकिस्तानवर येतात. पण, सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

मिंधे-भाजपने महाराष्ट्राची वाट लावली!

स्त्रियांवरील अत्याचार, कोयता गँगसदृश घटना, वारंवार होणारे गोळीबार… महाराष्ट्रातील शहरे आणि गावे या गुन्हेगारीने ग्रासले आहेत. राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली या मिंधे-भाजपाने!, असे ट्विट करीत आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजप सरकारवर टीकास्त्र डागले.