थोडी शरम असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपल्या अकार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार; अंबादास दानवे यांचा घणाघात

जर थोडी शरम असेल, तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकायला हवा. आपल्या कार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार आहात? असा रोखठोक सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. उरण, नवी मुंबई, बदलापूर, अकोला आणि मुंबईनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. करवीर तालुक्यातील शिये गावात एका 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपण हत्या करण्यात आली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

कोल्हापुरात घडलेल्या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट (X) करत मुख्यंमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “कोल्हापूरातील राजघराण्याने कधी काळी पोलीस, महिला आणि मुलांना सन्मानाने जगता यावे म्हणून मानवतेला प्राथमिकता दिली. त्याचा सन्मान म्हणून पंतप्रधान मोदी पोलंडमध्ये जाऊन स्मारकाला नमन करतात आणि इकडे त्यांच्या चेल्यांच्या राज्यात 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार होतो आणि तिची हत्याही होते.” असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“राज्यकर्ते महिलांना सुरक्षा प्रदान करू शकत नसतील तर त्यांनी खात्यात टाकलेले 1500 रुपये काय उपयोगाचे? विशेष म्हणजे कोल्हापुरात ही घटना उघडकीस येत असताना मुख्यमंत्री ‘लाडक्या बहिणीं’वर फुलांची उधळण करत होते, ते ही कोल्हापूरातच. या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या गावात ही घटना घडली आहे. आता थोडी शरम असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकायला हवा. आपल्या अकार्यक्षमतेचे अजून किती पुरावे देणार आहात?” असा बोचरा सवाल अंबदास दानवे यांनी उपस्थित केला आहे.