तुम्ही 15 दिवस का शांत होता, आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय? अनिल देशमुख यांचा फडणवीसांना सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. हे आरोप परमबीर सिंग यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केले आहेत. तसेच परमबीर सिंग आणि सचिन वाझे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना या दोघांना फडणवीस यांनी पुढे केले आहे. असा प्रत्योरोप करत देवेंद्रजी तुम्ही 15 दिवस शांत का होता, माझ्यावर आरोप करायचे. तुम्हाला आता आठवले काय, असा परखड सवाल अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणला जात होता, असा दावा परमबीर सिंग यांनी केला होता. याबाबत परमबीर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफाश करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरून आता अनिल देशमुख यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अनिल देशमुख यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की,वा… देवेंद्र फडणवीस जी! मी 15 दिवसापुर्वी, तुम्ही 3 वर्षापुर्वी कसे श्री.उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे जो देशद्रोहाच्या व 2 खुनाच्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापासुन जेलमध्ये आहे, तसेच परमविर सिंग ज्याने 3 वर्षापुर्वी उद्योगपती श्री.मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कार्पीओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कार्पीओ गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्हाचा सुत्रधार आहे. अश्या आरोपी परमविर सिंग याला पुढे केले आहे. आता दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोपटा सारखे बोलत आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा मुळे सुत्रधार परमविर असल्यामुळे आम्ही त्याला 3 वर्षापुर्वी निलंबीत केले. त्याला 3 वर्षापुर्वी केंद्रीय एजंन्सी कडुन अटक होणार होती. पण तो भाजपाला शरण गेला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतल्याप्रमाणे आरोप करीत आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होता आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय ? असा सवालही अनिल देशमुख यांनी पोस्टद्वारे फडणवीस यांना केला आहे.