छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार; नामांतराला आव्हान देणारी याचिका SC ने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराविरोधात याचिका करण्यात आली होती. या प्रकरणी आज सुनावणी झाली.

औरंगाबाद आणि उस्मानाबद यांचे नामांतर करून राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार हा कायद्यानुसार राज्य सरकारला आहे. तसेच नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. अलहाबाद आणि औरंगाबाद नामांतर प्रकरण एकसारखे नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी 8 मे रोजी निकाल दिला होता. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.