तीन वर्षापासून फुटलेल्या बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पुन्हा चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

भंडारा जिल्ह्यातील सेलोटी रोड परिसरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते मानेगाव बेळा पर्यंत जोडणाऱ्या पानदान रस्त्याचे काम मागील काही दिवसापूर्वी करण्यात आले होते. या रस्त्यावर आदर्श नगर कडून सेलोटीकडे जाणाऱ्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम झाले होते. बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मागील तीन वर्षापासून बंधारा फुटला असून लाखनी मानेगाव बेळा येथे जाणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी आणि शेतीपूरक वाहनांसाठी बंद झालेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा तहसील कार्यालय लाखनी येथे अर्ज विनंती केली. मात्र याचा काही फायदा झालेला नाही. यामुळे सदर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे उन्हाळ्यामध्येच निवेदन सादर केले होते.  पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. यावर शेतकरी नाराज असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही अदयाप काम सुरु झाले नाही. त्यामुळे आता तरी जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्याल का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.  प्रशासनाने एकदा तरी लक्ष देत, चौकशी करून परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.