मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली बेस्ट बस सध्या आर्थिक अडचणीत आहे. ही अडचण दूर न केल्यास मुंबईकरांच्या जीवनमानावर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बेस्ट बसला आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लेखी निवेदन देत आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. बेस्ट बससेवेला मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य करावे, बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये, बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आणि पेन्शन मिळत रहावी, तारीख चुकवली जाऊ नये आणि बसच्या संख्येतील नियोजित वाढ तातडीने अंमलात आणली जावी, अशा मागण्या आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत.
My letter to @mybmc municipal commissioner Bhushan Gagrani ji, with regards to the BEST.
I have requested him to financially support the BEST.
If the BMC can be made to support MMRDA, why not BEST?Financial support would ensure:
1) no fare hike
2) salaries and pensions on… pic.twitter.com/cFmuS2zx9N— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 25, 2024
मुंबईची जीवनवाहिनी आणि मुंबईकरांचा अभिमान असलेली ‘बेस्ट’ बससेवा आर्थिक अडचणीत आहे. परंतु तिला पूर्वी मान्य केलेले आर्थिक सहाय्य करायला मुंबई महानगरपालिकेने नकार दिल्याचे समजले. लाखो मुंबईकरांना दरोरोज इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या बससेवेच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचे कार्य माझ्या हातून होऊ शकले, ह्याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘बेस्ट’ बससेवेचे खच्चीकरण केले जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मिंधे राजवटीचा ‘बेस्ट’ बससेवा संपवून त्यांच्या कुठल्या कंत्राटदार मित्रांच्या खासगी सेवेला चालना देण्याचा डाव नसेल, तर आपण ह्या वरील सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराल आणि मुंबईकरांची ‘बेस्ट’ संकटातून बाहेर काढाल, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात मुंबईच्या ह्या बससेवेकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. आर्थिक अडचणीत आलेली बससेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होणार आहे. जर मुंबई महानगरपालिका एमएमआरडीए सारख्या संस्थेला आर्थिक सहाय्य करू शकते, तर ‘बेस्ट’ बस सेवेलाही आर्थिक सहाय्य मिळायलाच हवे, अशी जोरदार मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.