नरेंद्र मोदी बोलतात एक आणि करतात भलतच; लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून राहुल गांधी यांचा निशाणा

संसदेचं अधिवेशन सुरू आहे. एकीकडे नवनिर्वाचित खासदारांचा शपधविधी होत असताना दुसरीकडे लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून दिल्लीतील वातावरण तापले आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. पण उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना द्यावे लागेल, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. पण आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार अशी चिन्हे आहेत.

लोकसभा अध्यक्षपदी आतापर्यंत संसदेच्या परंपरेनुसार सर्वनुमते निवड केली जाते. पण यावेळी ही परंपरा मोडीत निघणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रथमच निवडणूक होणार आहे. बुधवारी म्हणजे उद्या लोकसभा अध्यक्ष निवडले जाणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून लोकसभेचे माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश हे उमेदवार असतील.

काय म्हणाले राहुल गांधी?

विरोधी पक्षांनी लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. आम्हाला लोकसभा उपाध्यक्षपद द्या, असे विरोधी पक्षांनी स्पष्ट केले. पण अद्याप सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सहमती होऊ शकलेली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा विरोधी पक्षांना फोन आला होता. लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि एकमताने निवड व्हावी, असे राजनाथ सिंह म्हणाले. आम्ही लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊ मात्र उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना द्या, असे आम्ही राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. राजनाथ सिंह त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुन्हा फोन करणार होते. पण त्यांचा फोन आलाच नाही. मोदी बोलतात एक आणि करतात भलतच. उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळाले तरच आम्ही लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊ, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.