निवडणूक लढवून उज्ज्वल निकम फसले! हत्या प्रकरणातील आरोपीने घेतला आक्षेप

लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनीच दारूण पराभव केला. आता हा पराभव उज्ज्वल निकम यांची पाठ सोडत नाहीये. अनेक हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या विजय पालांडे याने अॅड. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात कोर्टात याचिका केली आहे.

उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला आरोपी विजय पालांडे याने कोर्टात आव्हान दिले आहे. आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे भाजपकडून निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार आणि अजेंडा बदललेला आहे. उज्ज्वल निकम हे भाजपचे नेते आहेत, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे.

आरोपी विजय पालांडे हा 2012 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्लीतील व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्युसर करणकुमार कक्कड यांच्या हत्येचा पालांडेवर आरोप आहे. दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला होता.