लेख – जम्मूमधील दहशतवादी हल्ल्यांचे कारण

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

बरोबर एक महिन्याने जम्मू आणि कश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन पाच वर्षे पुरी होतील. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबविली जात आहे हे पाकिस्तानला खुपत आहे. जम्मूकश्मीरचे सुरळीत होत जाणेही दहशतवादी आणि पाकिस्तानला आवडत नाही. जम्मूतील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचे तेच प्रमुख कारण आहे. अलीकडे झालेल्या चार मोठय़ा दहशतवादी हल्ल्यांचा उद्देश तोच आहे.

जम्मू-कश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या चार दिवसांत चार दहशतवादी घटना घडल्या. भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दीर्घ काळ दहशतवादग्रस्त असलेले कश्मीर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच हे दहशतवादी हल्ले झाले आहेत.   कश्मिरी तरुणांच्या दहशतवादी कारवायांसाठी वापर करण्याच्या पाकिस्तानच्या डावपेचांमुळे कश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे. 370 वे कलम रद्द करतानाच तिथे शांतता नांदण्यासाठी पेंद्राने पावले उचलल्यानंतर त्यांचे चांगले परिणाम दिसत आहेत. दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले होते आणि हल्ले फक्त कश्मीर खोऱ्यात हिंदू किंवा बाहेरून आलेल्या नागरिकांवर होत होते. दुसरीकडे विकासकामे होत आहेत आणि पर्यटकांचा ओघ 2.5 कोटीपर्यंत वाढला आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या आणि यंदा लोकसभा निवडणुकीत साठ टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान यांमुळे जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केंद्रात एनडीए सरकारचा शपथविधी सुरू असताना हा हल्ला झाला. कटाराच्या दिशेने निघालेल्या या बसवर रेसाई येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये नऊ निरपराध्यांचा जीव गेला आणि 33 जण जखमी झाले.

बरोबर एक महिन्याने जम्मू आणि कश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन पाच वर्षे पुरी होतील. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबविली जात आहे. नेमके हेच पाकिस्तानला खुपत असल्याने तिसरे मोदी सरकार आल्यानंतर चार मोठे हल्ले त्यांनी घडवून आणले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा दल सरोवरजवळ असणाऱ्या संमेलन केंद्रात आंतरराष्ट्रीय योगदिनी योगासने करणार आहेत. यातून जगाला कश्मीर शांत असल्याचा संदेश जावा, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. जम्मू-कश्मीरचे सुरळीत होत जाणे दहशतवादी आणि पाकिस्तानला आवडत नाही. जम्मूतील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचे तेच प्रमुख कारण आहे.

पिर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या भागांत म्हणजे पुंछ, राजौरी, सुरनकोट, उधमपूर, जम्मू भागामध्ये 25 ते 30 दहशतवादी कार्यरत असावेत, जे दहशतवादी हल्ले करत आहेत. हे सगळे दहशतवादी पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सेसचे रिटायर्ड सैनिक असावेत. सध्या 60 ते 70 दहशतवादी सीमेपलीकडे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या निगराणीत दबा धरून बसले आहेत. त्यांना संदेश किंवा आदेश मिळताच ते भारतात घुसून हिंसाचार माजवतील.

दहशतवादी संघटनांनी आपले लक्ष कश्मीरकडून जम्मूकडे वळविल्यालाही आता बराच काळ झाला. जम्मू तुलनेने शांत होता. तेथील जनजीवन कश्मीर खोऱ्यापेक्षा अधिक सुरळीत होते.

पुंछ, राजौरीच्या भागामध्ये राष्ट्रीय रायफलचे व्हिक्टर फोर्स तैनात होते, ज्यांची संख्या 25 ते 30 हजार सैनिक एवढी होती. मात्र या भागात दहशतवाद संपल्यामुळे आणि चीन सीमेवर जास्त सैनिकांची तैनाती जरुरी असल्यामुळे व्हिक्टर फोर्सला येथून हलवण्यात आले आणि लडाखमध्ये पाठवण्यात आले. स्वाभाविकच, सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती तुलनेने कमी झाली. याचा फायदा घेऊन कश्मीरमधील दहशतवाद पाकिस्तान पुन्हा पुनरुज्जीवित करत आहे. शिवाय हा भाग हिंदुबहुल आहे. कश्मीरमध्ये हल्ले करण्यापेक्षा जम्मूत ते करणे आपल्या अधिक फायद्याचे, तसेच जगाचे लक्ष वेधून घेणारे आहे, हे पाकिस्तानला माहीत आहे. सुदैवाने, जम्मू आणि कश्मीरमधील तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती अत्यंत कमी आहे. त्यामुळेच पाकिस्तानी तरुण किंवा इतर अनेक इस्लामी देशांमधील तरुणांना सोबत घेऊन दहशतवादी संघटना जम्मू-कश्मीरात हिंसाचार घडवीत आहेत.

दहशतवादावर नियंत्रणाकरता लष्कराची कारवाई जरुरी आहे. ‘दहशतवादी जिथून येत आहेत, तिथे जाऊन त्यांचा बंदोबस्त करा,’ असा आदेश असल्यामुळे भारतीय सैन्यदलांना मोठीच कारवाई करावी लागेल.

व्हिक्टर फोर्सने रिकाम्या केलेल्या भागांमध्ये पुन्हा एकदा नवीन सैन्य तैनात करण्यात आलेले आहे, ज्यामुळे या भागात हरकत करणे दहशतवाद्यांना कठीण होईल. पाकिस्तानच्या किंवा पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करावे लागतील. अशी कारवाई येत्या काही दिवसांत अटळ ठरली तर आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर पुन्हा एकदा नियंत्रण केले जाईल.

लेख लिहून संपवेपर्यंत टीव्हीवरती एक बातमी आली की, पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या एका ब्रिगेडियर हुद्दय़ाच्या अधिकाऱ्याला अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून मारले. अर्थातच अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये अजून मोठे दहशतवादी आणि त्यांना नियंत्रण करणारे आयएसआयचे अधिकारी मारले गेले तर आश्चर्य वाटू नये. आपले दिवस भरत आल्याची जाणीव झाल्याने पाकिस्तान दहशतवादाला बळ देतो आहे. मात्र त्यातून तो स्वतःचीच कबर खोदतो आहे, हे कळण्याएवढी समज त्या देशाच्या नेतृत्वाकडे नाही.