>> अॅड. संजय भाटे
मी एका शासकीय उपक्रमात अधिकारी पदावर आहे. सन 2012 साली माझा विवाह झाला. आम्हांस एक मुलगा झाला आहे. मी व माझी पत्नी सन 2017 पर्यंत एकत्र राहत होतो. त्यानंतर मी पत्नीस पुण्यात माझ्या आईवडिलांसमवेत राहावे व मी नोकरीच्या ठिकाणाहून येत जात राहीन, असे सांगितले. तिने नकार दिला. मग यातून वाद, भांडणे सुरू झाली. संबंधात बेबनाव आला व अन्य विषयांतही खटके उडू लागले. ती माहेरी निघून गेली. तिने माझ्या व माझ्या आईवडिलांच्या विरुद्ध 498 (अ ) नुसार तक्रार पोलिसांत केली. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गतदेखील न्यायालयात तक्रार दाखल केली. यात तिने माझ्यावर व्यभिचाराचे खोटे आरोप केले. आईवडिलांच्या विरुद्ध अतिशय घाणेरडे व गलिच्छ आरोप केले. इतकेच नाही, तर तिने नंतर याच सर्व आरोपांचा उल्लेख करत माझ्या नोकरीच्या ठिकाणीदेखील तक्रार केली. सन 2018 साली मी न्यायालयात क्रूरता व मला सोडून जाणे या मुद्दय़ावर घटस्फोटाची केस दाखल केली. तिने उलटतपासणी दरम्यान माझ्या विरुद्धच्या व्यभिचाराच्या व आईवडिलांविरुद्ध आरोपांच्या बाबतीत कोणतेही पुरावे नाहीत व ते आरोप तिच्या वकिलांनी सांगितल्यामुळे केले हे मान्य केले. घटस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. न्यायालयाने दोन्ही कारणांवरून केस फेटाळून लावली आहे. आता पत्नीकडून समेटाचा प्रस्ताव आला आहे. त्यानुसार ती आमच्या विरुद्धच्या सर्व केसेस मागे घेईल व त्यानंतर ती पुन्हा नांदावयास येईल, परंतु तिला आता यासंबंधात स्वारस्य नाही. तिची माझ्याकडून एक मोठी रक्कम घेऊन घटस्फोट घेण्याचीच इच्छा आहे. माझ्याही मनात आता तिच्या बद्दल प्रचंड कटुता आहे. अशा परिस्थितीत मी तिच्याशी समझोता करावा का? मला उच्च न्यायालयात अपील केल्यास दिलासा मिळू शकतो काय?
>> एक पीडित वाचक
उत्तर : हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम 13 अन्वये घटस्फोटासाठीची कारणे नमूद केली आहेत. त्या कलमाच्या पोटकलमानुसार (आय-बी) परित्याग (Desertion) हे एक कारण आहे. यात तक्रारदार जोडीदाराचा वाजवी कारणासाठी परित्याग केला हे समोरील वैवाहिक जोडीदाराला सिद्ध करावे लागते. तुमच्या पत्नीस ती तुमच्या समवेत नांदावयास तयारच होती, परंतु तिने पुण्यातच राहावे या तुमच्या हट्टापोटी घर सोडून जाण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही असा बचाव उपलब्ध आहे. हे सकृतदर्शनी वाजवी आहे. सबब, तुमची परित्यागाच्या कारणावरची केस ही कमकुवत दिसते.
हिंदू विवाह अधिनियमान्वये वैवाहिक जोडीदाराची क्रूरता हेदेखील एक विधीमान्य कारण आहे. तथापी या अधिनियमात क्रूरता म्हृणजे नेमके काय हे स्पष्ट केले नाही. क्रूरता ही शारीरिक वा मानसिक असू शकते. तुमच्या प्रकरणात मानसिक क्रूरतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्यायनिर्णयात वैवाहिक जोडीदारातील क्रूरता काय असू शकते ते स्पष्ट केले आहे. ‘व्ही.भगत विरुद्ध डी. भगत’ या प्रकरणात मानसिक क्रूरता म्हणजे काय हे स्पष्ट करताना असे सांगितले आहे की, एका वैवाहिक जोडीदाराचे दुसऱ्या जोडीदाराप्रती असे वर्तन, ज्यामुळे त्या दुसऱ्या जोडीदारास अशा मानसिक यातना व त्रास भोगावयास लावणे, ज्यामुळे त्या पीडित जोडीदारास त्यासमोरील जोडीदाराबरोबर सहजीवन व्यतीत करणे अशक्य व्हावे. पुढे ‘परवीन मेहता विरुद्ध इंद्रजित मेहता’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय असे म्हणते की, मानसिक क्रूरता ही मानसिक अवस्था आहे. मानसिक क्रूरता ही थेट पुराव्याद्वारे सिद्ध करणे अवघड आहे. न्यायालयानेच तथ्य व परिस्थितीवरून याचा कयास करावयाचा असतो.
तुमच्या प्रकरणात तुमच्या विरुद्ध तुमच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या अनेकविध तक्रारी तसेच तुमच्या विरुद्ध तुमच्या नोकरीच्या ठिकाणी केलेली तक्रार, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची झालेली बदनामी, व्यभिचाराचे आरोप व त्यामुळे तुमचे झालेले चारित्र्यहनन व महत्त्वाचे म्हणजे हे सर्व आरोप खोटे होते व ते आपण आपल्या वकिलाच्या सल्ल्यावरून केले ही तुमच्या पत्नीने न्यायालयात दिलेली कबुली या बाबी खालील न्यायालयाने नीट ध्यानात घेतलेल्या नाहीत असे दिसते. ही सर्व तुमच्या प्रतीच्या तिच्या मानसिक क्रूरतेचीच उदाहरणे आहेत. सबब, क्रूरतेच्या मुद्दय़ावर तुमची केस सज्जड आहे. तुम्ही उच्च न्यायालयात जावे.
विवाह हा दोन वैवाहिक जोडीदारांनी परस्परांप्रती प्रेम, वचनबद्धता, बांधिलकी, समर्पण, सहचर्य या उच्च मानवी भावना मनी बाळगत करावयाचा सहप्रवास आहे. त्यास कटुता व गैरविश्वासाने ग्रासले तर हाच प्रवास असह्य होतो व जगणे नकोसे होते. तुम्ही नमूद केले आहे की, तुमच्या पत्नीच्या वरील सर्व कृत्यांमुळे तुमच्या मनात तिच्याविषयी प्रचंड कटुता आहे. असे असेल तर तिला वाजवी रक्कम देऊन तुम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घ्यावा व नव्या आशेने व नव उन्मेशाने जीवनाची सुरुवात करावी हे योग्य.
लेखक हे उच्च न्यायालयात वकिली करतात. वाचक आपले प्रश्न या [email protected] ईमेल आयडीवर पाठवू शकतात.