आयपीएलचा सतरावा हंगाम विविध कारणांमुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. एकीकडे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी चाहत्यांना पाहालया मिळाली. मात्र दुसरिकडे याच चाहत्यांना स्टेडियमवर खराब जेवण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकार चिन्नास्वामी स्टेडियमवर घडला असून व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 मे 2024 रोजी बंगळुरुविरुद्ध (RCB) दिल्ली (DC) यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव केला. बंगळुरुने विजय संपादित केल्यामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण होते. याच चाहत्यांमध्ये 23 वर्षीय चैतन्यचा सुद्धा समावेश होता. तो त्याचा मित्र गौतम सोबत सामना पाहण्यासाठी आला होता. सामन्यादरम्यान चैतन्यने कॅटिंनमधून डाळ, इडली, चना मसाला, कटलेट आदी पदार्थ खाण्यासाठी मागवले होते. मात्र त्यानंतर त्याचे पोट बिघडले आणि काही समजण्याच्या आत तो खाली पडला.
चैतन्य अचानक खाली पडल्यामुळे गौतमची सुद्धा तारांबळ उडाली. स्टेडियम मधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने चैतन्यला स्टेडियमच्या बाहेरील रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर मात्र त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता चैतन्यला अन्नातून विषबाधा झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर चैतन्यने कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.