Uddhav Thackeray Interview Part 1 : याद राखा; मोदी मला संपवू शकत नाहीत! उद्धव ठाकरे कडाडले!

>> संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रचाराने महाराष्ट्रात तुफान निर्माण केले. निवडणुकांच्या कुरुक्षेत्रावर उद्धव ठाकरे अर्जुनाप्रमाणे लढताना देश पाहात आहे. महाराष्ट्रात ते फिरत आहेत. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला जोरदार रोखठोक मुलाखत देऊन अनेक विषयांवर परखड मते मांडली. ‘‘लोकशाही वाचविण्यासाठी हे महाभारत सुरू आहे. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हा लढा आहे,’’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या मोगलाईवर शक्तिमान हल्ला केला. ‘‘दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू.’’

मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध होत आहे.

नुकतेच कोकण दौऱयावरून आलेले उद्धव ठाकरे प्रसन्न दिसले. विजयी होत असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱयावर स्पष्टच दिसत होता.

‘जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात भगवी लहर आहे. राज्यासह देशात बदल नक्की होतोय…’ अशी सुरुवात त्यांनी केली.

– देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं महाभारत सुरू आहे, पण निवडणुकांचं हे महाभारत इतकं लांबलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे, असं वातावरण निर्माण झालं आहे. या महाभारतामध्ये सर्वात जास्त लक्ष कुठे असेल, तर ते महाराष्ट्राकडे आहे… आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. काय सांगाल?

– आपण जो उल्लेख केलात, की आताची निवडणूक ही महाभारतासारखी चालली आहे. हे खरंच आहे. त्यावेळच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यावेळेला आपल्या देशातील लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता. त्या काळात आपण नव्हतो. ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतिवीरांनी आणि त्याग करणाऱया सगळय़ा स्वातंत्र्यसैनिकांनी अपार कष्ट करून, शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केलंच पाहिजे.

– उद्धवजी, प्रदीर्घ प्रवास करून आपण मुंबईमध्ये परत आला आहात. रणरणत्या उन्हात गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताय. फक्त शिवसेनेचाच उमेदवार नाही, तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीने वेळ देताय. मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होतं. आज मी आपल्या छातीवरती ‘मशाल’ पाहतोय. धनुष्यबाण ते मशाल हे जे स्थित्यंतर झालं, त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो?

– धनुष्यबाण ते मशाल… हे का घडलं? कोणी घडवलं? लोकशाहीचे एक प्रकारे धिंडवडेच निघतायत. संविधान पाळलं जात नाहीये. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस… अजूनही तिचा निकाल लागत नाहीये. वारंवार कोर्टानं फटकारे मारलेत. खडे बोल सुनावलेत. तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते, त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? त्यांनी अधिवेशन बोलावलं ते कसं चूक होतं, त्याच्यानंतर लवादाने दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? याचं कारण सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय, पक्ष पुणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच काय, जे मी म्हटलंय लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजूनही याचा निर्णय आलेला नाहीये. सगळाच गोंधळ सुरू आहे.

-सर्वोच्च न्यायालयातही वेळकाढूपणा चाललाय…

– सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार याची मला खात्री आहे. कारण तसं घटनेमध्ये नमूदच आहे. परिशिष्ट दहा! सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला ‘नकली शिवसेना’ म्हणतायत. याचा अर्थ उघड आहे… निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये, असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतायत की काय, असा प्रश्न पडलेला आहे.

…म्हणजे संपूर्ण यंत्रणेवरती दबाव आहे?

– नासवून टाकलीय. दुसरं काय म्हणायचं?

दहशत आहे?

– होय!

-देशामध्ये महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला, सत्यासाठी झाला… आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते… कृष्ण आहेच, पण अर्जुन आणि अभिमन्यू! विरोधक असं म्हणताहेत की, उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय…

– बरोबर आहे, पण अभिमन्यू हा शूर होता. तो भेकड नव्हता. आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमांतून चक्रव्यूह टाकतायत हे भेकड लोक आहेत. यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाहीये लढायचं. अभिमन्यू चक्रव्यूहात घुसला होता. हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकांत लढवतायत. म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामाऱया लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली. कुटुंबं फोडतायत. कुटुंबात कलह निर्माण करतायत. पक्षामध्ये भांडणं लावतायत. हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना? ही कौरवनीती जी आहे, ती कौरवनीती शेवटी हरणार आहे. कारण कौरव त्या वेळेला शंभर होते. पांडव पाचच होते; पण पाच पांडवांनी शंभर कौरवांवरती मात केली होती. कारण पांडव हे सत्यासाठी व धर्माच्या बाजूने लढत होते. म्हणूनच स्वतः श्रीकृष्णसुद्धा पांडवांच्या बाजूने होता.

 हे युद्ध आपण जिंकताय?

– नक्कीच!

एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चाललाय? आपण स्वतः गेल्या काही काळापासून म्हणजे निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासून महाराष्ट्रात फिरताय… एका तयारीने फिरताय. या काळात राज्यात सर्वात जास्त फिरणारे नेते आहात. प्रचाराची ही दिशा कशी आहे?

– दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे साहजिकच आहे, गेल्या दहा वर्षांत मी मुद्दामहून आता मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे; पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे.

पुलवामात जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे सत्य किंवा वास्तव… विस्तवासारखं असलेलं जे वास्तव जगासमोर मांडलं, त्याला कुणी उत्तर देऊ शकलेलं नाही. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. तेही कश्मीरचे. त्यांचे अधिकार सर्वांना माहीत आहेत. अधिकृत पदावर बसलेल्या, घटनात्मक पदावर बसलेल्या माणसानं जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं, त्याच्यावरती आज कुणी चर्चा करत नाहीये. काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण? पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण?

मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातील मुद्दे काही इकडे मांडत नाही; पण मी या सरकारला गझनी सरकार म्हणतो.

 गझनी सरकार?

– 2014 साली ते जे काय बोलले ते त्यांना 2019 साली आठवत नव्हतं. 2019 साली जे काय बोलले ते आता आठवत नाहीये. आज काय बोलतायत ते उद्या आठवणार नाहीये. त्यांना असं वाटतं की, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला म्हणजे जनतेच्याही झाला. पण असं नाहीये. कारण जनता ही दोन वेळेला म्हणजे 10 वर्षे मूर्ख बनली; पण ते जे म्हणतात नं, ‘तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता; पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही…’ आता जनता पेटलेली आहे. जनता पेटून उठलेली आहे. यांच्या ज्या काय सगळय़ा भाकडकथा होत्या… शेतकऱयांचं उत्पन्न दुप्पट होणार, प्रत्येकाला घर मिळणार… प्रधानमंत्री किसान सन्मान योजना वगैरे वगैरे या भूलथापा तर आहेतच, त्याच बरोबरीने भ्रष्टाचाऱयांना एकत्र घेतायत हे. पक्ष फोडतायत. ही गद्दारी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रानं गद्दारी कधीच सहन केलेली नाही. मागे मला आपले धाराशिवचे खासदार ओमराजे यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. तीनशे-चारशे वर्षे जी काय झाली असतील ती असतील; पण अजूनही खंडूजी खोपडे हे नाव घेतल्यानंतर आपण काय म्हणतो? गद्दार! पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे यांची नावे घेतली की हे कट्टर सैनिक. म्हणजे 300-400 वर्षे झाल्यानंतरही खोपडय़ाच्या माथ्यावरती असलेला गद्दारीचा जो शिक्का आहे, तो कुणाला पुसता नाही आलेला, तर या भेकडांची काय अवस्था होईल!

हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय आहे, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून चाललेला, हा जनतेमध्ये पोचलेला आपल्या प्रचारात दिसतोय का?

– फारच तीव्रतेने तो जाणवतोय… आणि तुम्ही मघाशी जो उल्लेख केलात माझ्या छातीवरती असलेल्या मशालीचा, तशाच जनतेच्या हृदयामध्ये मशाली पेटल्या. कारण ती एक आग आहे. आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात! कारण बघा तुम्ही. 2014 आणि 2019 ला प्रधानमंत्रीपदी मोदीजी पोचले, त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40 पेक्षा अधिक खासदार हे एकटय़ा महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केली; तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात. कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच. हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच, त्या शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे. हे मी एवढय़ासाठी म्हणतो, कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजींनी आपल्या गावाला म्हणजे गुजरातला नेले. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले, मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेले, मेडिकल डिव्हाईस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, वेदांता-फॉक्सकॉन तिकडे नेला…

 …पण हे सर्व आपण पाहत बसलो. मोदी, शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरबाडून नेत असताना आपण सगळे हे फक्त त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या. आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही.

– हो. याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्या वेळेला ते नेऊ शकले नव्हते. आता मात्र या सगळय़ांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन झालं नं. म्हणजे डबल इंजिन सरकार लागल्यानंतर वेगाने हे उद्योगधंदे पळवले. आपल्या हातात आता सत्ता नाहीये. महाराष्ट्रात बेकारी वाढतेय, बेरोजगारी वाढतेय, सगळं काही वाढतंय. हा जो एक राग आहे. तुम्ही आमचा का घात केलात? महाराष्ट्राचा का घात केलात? आज मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्षे मिळाला आहे. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो, हा मोदीजींनी अनुभवावा.

 आपण महाराष्ट्रातून उद्योग, व्यापार-व्यवसाय गुजरातला ओरबाडून नेल्याचा उल्लेख केला. यापूर्वी महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं. प्रत्येक सरकार, मग ते काँग्रेसचं असेल किंवा अन्य पक्षांचं असेल, त्या मुख्यमंत्र्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेची स्थापना मुळी त्यासाठीच झाली आहे की, महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान. हिंदुत्व नंतर आलं; पण आज आम्ही खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्यकर्ते आहेत… त्यांचं काय?

– त्यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे, ए सं शिंदे त्याचा फुलफॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ?

 हे जे शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार काय? मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं, ते तर कुठेच दिसत नाहीये… आणि हे उघडय़ा डोळय़ानं महाराष्ट्राची लूट पाहताहेत…

– त्याचाच तर राग जनतेला आलाय. म्हणजे एकतर तुम्ही गद्दारी करून राजकारणातल्या आईशी हरामखोरपणा केलात, शिवसेनेशी गद्दारी केलीत. राजकारणात जन्म देणाऱया शिवसेना या आईच्या कुशीवर तर तुम्ही वार केलाच; पण महाराष्ट्राशीही तुम्ही गद्दारी केलीत. ती महाराष्ट्रात नाही चालणार!

 नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा धडाका लावतायत, गल्लीबोळांत फिरतायत. एक-दोन दिवसांत ते घाटकोपर भागातही रोड शो करणार आहेत. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायटय़ांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. हे तुम्ही किती गांभीर्याने घेताय?

– हाच तर निकाल आता या वेळच्या निवडणुकीत लागणार आहे. मराठी माणसं या पद्धतीने कधीही कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाहीत; पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडतंय? आणि त्यांना म्हणजेच मराठी द्वेष्टय़ांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न आहे. मराठी माणूस दाखवेल नं त्यांना काय दाखवायचंच ते! पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा… कोरोना काळामध्ये आपण जे काम केलं, ते हे लोक कधीच विसरलेले नाहीयेत. मी जात व प्रांतभेद केला नाही.

– तुम्ही हा भेदभाव कधीच केला नाहीत…

– नाही. कधीच नाही. उत्तर प्रदेशात गंगेत प्रेतं वाहत होती. गुजरातमध्ये सामूहिक चिता पेटल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं. त्या वेळेला मोदी रिकाम्या थाळय़ा वाजवत होते. दिवे लावा, दिवे विझवा, कोलांटउडय़ा मारा, बेडूकउडय़ा मारा, उठा-बशा काढा… याने कोरोना जात नाही. कोरोना यामुळे नाही गेला. मला एका गोष्टीचं समाधान आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मी जे जे काय सांगत गेलो, ते ते ती ऐकत गेली. त्यांच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही. या पलीकडे जाऊन मी सांगतो, गुजरातबद्दलदेखील माझ्या मनात काही आकस नाहीये. गुजरातही आमचाच आहे; पण हाच भाव गुजराती माता, बंधू-भगिनींनीही ठेवलाच पाहिजे. जे इथे राहतात. उलट 92-93 साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलं. मोदी कुठे होते त्या वेळी?

 उद्धवजी, चौथ्या टप्प्याकडे आपण जातोय…

– त्यांनी टप्पा काय, सरपटी टाकली तरी निवडणुकीच्या निकालात ते सरपटणार आहेतच!

 आपण अशी रोज एकेक गुगली टाकताय की त्यांना आता पिचवर बचाव करणं कठीण झालंय; पण तिसरा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडतायत, ज्या चिंताजनक आहेत.

– होय, चिंता करावी अशीच परिस्थिती सर्वत्र आहे.

 काल निवडणुकीला सामोरे जात असताना कश्मीर खोऱयामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली. चार वर्षांपूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले व 40 जवानांची हत्या झाली.

– या हत्यांना जबाबदार कोण आहे ते पहा. हेच नेभळट सरकार ना?

 काल त्याच पद्धतीने पूंछ येथे हवाई दलाच्या ताफ्यावर कश्मीरमध्ये हल्ला झाला. कश्मीरात शांतता आहे, असं मोदी-शहांचं म्हणणं आहे. आम्ही 370 कलम हटवलंय, आम्ही हे केलंय, ते केलंय, तरीही कश्मीरमध्ये लष्करी जवानांचे बळी जातायत, हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतं?

– पुलवामात जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे सत्य किंवा वास्तव… विस्तवासारखं असलेलं जे वास्तव जगासमोर मांडलं, त्याला कुणी उत्तर देऊ शकलेलं नाही. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. तेही कश्मीरचे. त्यांचे अधिकार सर्वांना माहीत आहेत. अधिकृत पदावर बसलेल्या, घटनात्मक पदावर बसलेल्या माणसानं जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं, त्याच्यावरती आज कुणी चर्चा करत नाहीये. काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण? पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण? आणि हा जबाबदारीचा धोंडा ज्याच्या त्याच्या पक्षामध्ये आपण टाकणार आहोत की नाही? कारण अजूनही जर कश्मीर अशांत असेल तर कशासाठी यांना परत मतं द्यायची? एका बाजूने लेह-लडाखमध्ये असेल, अरुणाचलमध्ये असेल, चीन अतिक्रमण करतोय, रस्ते बांधतोय. आपल्या गावांची नावं बदलतोय. तरीसुद्धा आम्हाला म्हणजे सरकारला काही वाटत नाही.

 कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित छावण्यांमध्ये आहेत…

– मध्यंतरी मोदीजी मा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांबद्दल बोलले होते की, बाळासाहेबांनी कधी हा विचार नाही केला की, कश्मीरमधले पंडित, माझा काय संबंध? अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदुहृदयसम्राटच होते. तेव्हा कश्मिरी पंडितांना शिवसेनाप्रमुखांनी बोलावलं, त्यांना आश्रय दिला. त्या वेळी मोदी हे नावसुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं. आता तुम्ही तर पंतप्रधान आहात. तरी कश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीयेत. कश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत, मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाहीत. मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाहीयेत. जणू काही सगळे प्रश्न संपले आहेत… आणि उद्धव ठाकरे हा एकच प्रश्न देशासमोर आहे, अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्राच्या वाऱया करत आहेत. हे काहीतरी आक्रितच आहे! म्हणजे उद्धव ठाकरेंना संपवून कश्मीर शांत होणार आहे का? उद्धव ठाकरेंना संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का? उद्धव ठाकरेंना संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत परत मिळणार आहे का? मोदींकडे काय उत्तरं आहेत याच्याबद्दल…?

 लोकसभा निवडणुकीआधी राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मोदी टीका करतायत किंवा अमित शहा टीका करतायत की, उद्धव ठाकरे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळय़ासाठी उपस्थित राहिले नाहीत…

– शंकराचार्य का नव्हते? शंकराचार्यांना का बोलावलं नाही? विचारा त्यांना!

 त्याचं कारण असं आहे की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, ते प्राणप्रतिष्ठा सोहळय़ास अयोध्येत हजर राहिले नाहीत हे वारंवार ते महाराष्ट्रात येऊन सांगतायत… तुमची कृती ही हिंदुत्वविरोधी आहे, असे ते सांगतायत…

– मी कुठे होतो त्या दिवशी? मी अयोध्येला गेलो नाही. याचं कारण मला काही मानपान पाहिजे होता असे नाही. उलट मोदींच्याही आधी मी तिथे गेलो होतो. राममंदिराचा विषय तेव्हा थंड बस्त्यात पडलेला होता. साधारण नोव्हेंबर 2018 चा काळ होता. आपणही सोबत होतात. मी शिवसैनिकांना घेऊन अयोध्येत राममंदिरात गेलो होतो. त्या वेळी तिथे मंदिर नव्हतं. अयोध्येत जाऊन मी प्रभू रामाचं दर्शन घेतलं व ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा आपण दिली. शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो. एक वर्षभरानंतर म्हणजे त्यानंतरच्या नोव्हेंबरमध्ये राममंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. त्यानंतर योगायोग असेल काही असेल, त्याच्या पुढच्याच महिन्यात ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री झाल्यावरही मी पुन्हा अयोध्येला गेलो. नंतर जेव्हा राममंदिराची प्राणप्रतिष्ठा वगैरे ठरली तेव्हा शंकराचार्यांनी त्यावर टीका केली. मीसुद्धा असं म्हटलं की, शंकराचार्यांना तुम्ही जरा नीट मान-सन्मानाने बोलवायला पाहिजे होतं. म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या वेळी तुमच्या बाजूला शंकराचार्य नव्हते; पण भ्रष्टाचारी वगैरे सगळे सोबत होते. 22 तारखेला मी काळाराम मंदिरात गेलो होतो. तुम्ही पण सोबत होतात… आम्ही जातोय म्हटल्यावर मोदीही तिथे जाऊन आले. बहुधा साफसफाई बरोबर होतेय की नाही ते बघून आले होते. तेथील साफसफाई करतानाचे त्यांचे पह्टो प्रसिद्ध केले होते.

 आपण काळाराम मंदिर का निवडलेत?

– या काळाराम मंदिराचं एक वैशिष्टय़ आहे. या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला होता. हा राम माझासुद्धा आहे. हा राम म्हणजे कुणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपची मक्तेदारी होतेय… म्हणूनच तर मी ‘भाजपमुक्त राम’चा नारा दिला होता. भाजपमुक्त राम मला पाहिजे. हे सगळे जे आहेत, यांना मी जो शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी… त्या विचारधारेची लोकं तेव्हा होती, त्यांच्याविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की, हा राम माझा आहे. माझासुद्धा आहे. राममंदिरात जाण्याचा मला अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेबांना राममंदिरात जाण्यापासून जे लोक अडवत होते, तेच आज माझ्यावरती टीका करताहेत. याच काळाराम मंदिरात मी गेलो, गोदावरीची पण आरती केली व अयोध्येतील राममंदिराचे मी स्वागत केले; पण हे राममंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झाले आहे.

ते अशी टीका करतात की, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत गेला आहात.

– मग काय झालं?

त्याच्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचाराने पुढे चालला आहात आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झाला आहात… असे ते म्हणतात. हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब का आठवतोय?

– कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात जाऊन त्यांनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी खाल्ला होता, त्याची आठवण होते. बिनबुलाये मेहमान बनून पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारी लोकं मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब हा आग्य्रात होता. औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठीच इकडे 27 वर्षे प्रयत्न करत होता. औरंगजेबाने त्या वेळी रोड-शो-बिड शो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही मला, पण महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे 27 वर्षे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्य्राला जाऊ शकला नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे!

 नक्कीच औरंगजेबाने रोड शो केले होते. इकडे येताना तो हत्ती, घोडे, पायदळ असा लवाजमा घेऊनच यायचा… हा रोड शोच होता!

– पण त्या वेळी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं जे शौर्य मराठय़ांनी गाजवलं, ते मराठे व त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत.

 मोदी व शहा वारंवार महाराष्ट्रात येतात आणि उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिल्या क्रमांकाचं टार्गेट आहे आणि त्यानंतर शरद पवार. महाराष्ट्राची सूत्रं या दोन नेत्यांनी पुन्हा हाती घेतल्यामुळे मोदी-शहांना त्यांचं भय वाटतंय?

– असं म्हणतात की, मोगलांच्या घोडय़ांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे. तसं आम्ही दोघे त्यांच्या खेचरांना दिसत असू.

मुळात औरंगजेब वगैरे प्रचाराचे विषय असू शकतात काय?

– हेच तर माझं म्हणणं आहे. तुम्ही 10 वर्षे काय केलंत? पराभवाचं भूत समोर दिसायला लागल्यावर तुम्ही राम राम राम राम… करायला लागलात… म्हणजे निवडणुकीत राम… राम… राम… करायचं आणि निवडून आल्यावर लोक प्रश्न घेऊन आले की, मरा… मरा… मरा… मरा… करायचं. शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही. शेतकरी मेला तरी चालेल… पाच वर्षांनंतर बघू. महिलांवर अत्याचार झाले तरी चालतील… पाच वर्षांनंतर बघू. तुम्हीच सांगितलं होतंत ना, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱयांना हमीभाव देऊ, उत्पन्न दुप्पट करू… याच हमीभावासाठी शेतकरी दिल्लीत यायला निघाले तर तुम्ही त्यांच्यावर बंदुका रोखता? त्यांच्यावर अश्रुधूर सोडता? त्या शेतकऱयांना तुम्ही दहशतवादी संबोधलंत. अर्बन नक्षल म्हणालात. शेतकरी जेव्हा दिल्लीला निघाले तेव्हा संघाचे कार्यवाह का काय म्हणतात ते दत्तात्रय होसबळे म्हणाले की, शेतकऱयांचे आंदोलन हे अराजक आहे. अशी सगळी ही माणसं आहेत!

 उद्धवजी, 10 वर्षे मोदी यांचं सरकार या देशावर आहे. 10 वर्षे हा खूप मोठा कालखंड आहे.

– देशाच्या आयुष्याची दहा वर्षे… आणि 140 कोटी जनतेची दहा वर्षे…

एका नेत्याला दोन वेळा म्हणजे सलग 10 वर्षे पंतप्रधान होण्याची संधी मिळते; पण 10 वर्षांनंतर जेव्हा तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातायत तेव्हा मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्दय़ांवर प्रधानमंत्री बोलतच नाहीत…

– भ्रष्टाचाऱयांना संरक्षण ‘मोदी की गॅरंटी’ हा विषय त्यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे?

 हा विषय चर्चेत आहेच…

– म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या. एक कुठली ती गोळी होती नं. त्याची जाहिरात नेहमी चालायची. वो खाओ और सब भूल जाओ. तसंच आहे. भ्रष्टाचार करो, भाजपा में आओ!

 नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा केली होती…

– हां. ते बरोबर आहे. म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी आहेत तेवढे भाजपात घेतायत. म्हणजे भारत मुक्त होतोय. इतर पक्ष मुक्त होतायत. म्हणून मी त्यांना ‘व्हॅक्यूम क्लीनर’ म्हटलेलं आहे. व्हॅक्यूम क्लीनर जसं कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल, कुठल्या फटीमध्ये धूळ असेल, ती धूळ खेचून घेतं. तसे हे सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतायत भाजपात. म्हणजे भ्रष्टाचारमुक्त भारत. भ्रष्टाचारमुक्त काँग्रेस. भ्रष्टाचारमुक्त शिवसेना…

मोदींच्या प्रचारात मुद्दे कुठले आहेत? मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्दय़ांवर मोदी बोलतायत…
– त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे. आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे.

 प्रत्येक निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते. खास करून लोकसभेची. आतापर्यंत 70-75 वर्षांतील निवडणुकांनी देशाचं भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीचं वैशिष्टय़ तुम्ही काय सांगाल?

– मी सभेत हे बोललेलो आहे. निवडणुकीमध्ये दोघांचं भविष्य ठरत असतं. साहजिकच आहे, पहिल्यांदा जनता त्यांच्या नेत्यांचे भविष्य ठरवते. तशी आज वेळ आलेली आहे. दहा वर्षांत ज्यांनी नुसत्या थापा मारल्या, त्या थापाडय़ांना तुम्ही डोक्यावर घेताय की फेकून देताय त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील. या थापाडय़ांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा 10 वर्षे थापाच खाव्या लागतील आणि ऐकाव्या लागतील; पण आता जर का यांना फेकून दिलं तर देशात शांतता नांदेल. कायदा-सुव्यवस्था राहील. लोकशाही टिकेल. अन्यथा देशासमोर मला वाटतं की काळे दिवस आहेत. अच्छे दिन तर काही आले नाहीत; पण काळे दिवस मात्र येऊ शकतात.

 उद्धवजी, एका बाजूला प्रचंड पैसा…

– कुठून आला?

 ही निवडणूक जी सुरू आहे… स्पष्ट दिसतंय…

– पैसा कुठून आला? हे मोदींनी स्पष्ट करावं.

 एका बाजूला अमर्याद पैसा, अमर्याद सत्ता. त्यात निवडणूक रोखे नावाचा प्रकार समोर आला. 10 हजार कोटी रुपये एका पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले. मोजक्या उद्योगपतींकडे पैसा गेला. अशी ताकद असलेला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱया बाजूला शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसची तर खातीच गोठवली. ही लढाई विषम आहे, असं वाटत नाही का?

– विषम तर आहेच आणि भीषण पण आहे. माझी मतदारांना विनंती आहे की, तुम्ही या पैशांवरती तुमची आयुष्यं विकू नका. पैसे घेऊन मत देणं म्हणजे तुमच्या आयुष्याची व भवितव्याची वाट लावणं आहे. तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य विकण्यासारखं आहे. हा पैसा भ्रष्टाचारातून मिळवलेला आहे. निवडणूक रोख्यांबद्दल तुम्ही विचारलंत तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्या सीतारामनबाई आहेत, त्यांचे पती परकला प्रभाकर यांनीच सांगितलंय की, जगातील हा सगळय़ात मोठा घोटाळा आहे. त्याला त्यांनी नाव दिलंय-‘मोदी-गेट.’ जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अमेरिकेत जे निक्सनचं प्रकरण घडलं होतं, तेव्हापासून हा ‘गेट’ शब्द प्रचलित झाला. त्या निक्सन गेटबरोबर या ‘मोदी-गेट’ची तुलना त्यांनी केली आहे.

 …पण वॉटरगेटमुळे निक्सनला जावं लागलं होतं…

– …आता लोकांनी यांनाही घालवलं पाहिजे. भ्रष्टाचार केल्यानंतर तेवढी नीतिमत्ता निक्सनकडे होती. आता तोच पैसा हे मतं विकत घ्यायला वापरतायत.

 अमेरिका असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, गेल्या काही वर्षांतल्या घटना पाहिल्या तर भ्रष्टाचार केलेल्या त्यांच्या प्रमुख राज्यकर्त्यांना ताबडतोब पदावरून जावं लागलं. पण इतका मोठा भ्रष्टाचार समोर येऊनसुद्धा मोदी आणि त्यांचा पक्ष आजही सत्तेवर आहे. त्यांना तुम्ही कसं घालवणार?

– आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणाने आणि मला बहुतेक सभांतूनही असं जाणवतंय की, आम्ही तर बोलत असतोच, पण लोकांनाही आता सगळं कळलेलं आहे. एखाद्या मुद्दय़ाला सुरुवात केली की, लोकच समोरून एकेक विषय बोलत असतात. म्हणजे जागृती हा विषय झालेला आहे. काल माझी रायगडला सभा होती. पूर्वी ते एक नाटक होतं ‘रायगडाला जेव्हा जाग येते.’ आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे.

 हा जागा झालेला जो देश आहे…

– तो यांना, या भ्रष्टाचाऱ्यांना झोपवेल!

(क्रमशः)