>>महेश उपदेव
श्रीरामचंद्र प्रभू यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात यंदा कॉग्रेसचे नेते सुनील केदार व मिंधे गटासाठी प्रतिष्ठेची लोकसभा निवडणूक ठरणार असून मिंधे गटाने भाजपच्या दबावाखाली विद्यमान कृपाल तुमाने यांची तिकीट कापून कॉग्रेसमधून आयात झालेल्या राजू पारवे यांना तर काँग्रेस महाआघाडीने शाम बर्वे यांना रिगणात उतरविले आहे, कॉग्रेस ने तिकीट नाकारलेल्या किशोर गजभिये यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे, या तिरंगी लढतीत रामटेकवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.
रामटेक तसा कॉग्रेसचा बालेकिल्ला आहे , माजी पंतप्रधान नरसिंहराव आंध्रप्रदेश चे रहिवासी असताना रामटेक मधून दोन वेळा लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. 1999 मध्ये शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपले लक्ष रामटेक कडे पेंद्रीत केले, आणि रामटेकच्या गडावर शिवसेनेचा झेंडा रोवल्या गेला, सुबोध मोहिते, प्रकाश जाधव, कृपाल तुमाने यांनी खासदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले आहे. मधल्या काळात राज्यात जो बदल झाला त्यात हा मतदार संघ विद्यमान खासदार कृपाल तुमाने मिंधे गटात सहभागी झाले, या दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने ही जागा कॉग्रेस साठी सोडली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाम बर्वे यांना या मतदार संघातील शिवसेना तसेच काँगेस आणि राष्ट्रवादीच्या ताकदीचा फायदा होणार हे निश्चित.
भाजपच्या दबावाचा शिंदना फटका
भाजपच्या दबावामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐनवेळी विद्यामान खासदाराला उमेदवारी नाकारून काँग्रेसमधून आयात करावा लागलेला उमेदवार, काँग्रेसच्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द होण्यासाठी सरकारच्या पातळीवर झालेली चपळाई अशा नाटयमय घडामोडींमुळे रामटेक (राखीव) मतदारसंघातील लढतीची सारी समीकरणेच बदलून गेली आहेत. मात्र भाजपने या मतदार संघात केलेल्या दबावाच्या राजकारणाचा फटका शिंदे गटाच्या पारवे यांना बसण्या शक्यता अधिक आहे.
कट्टर शिवसैनीक बर्वेच्या पाठिशी
नागपूर जिह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱया या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा आहे. येथील विद्यमान खासदाराने गद्दारी करून शिंदे गटात प्रवेश केल्यावरही कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने असून माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या सह विशाल बरबटे व शेकडो शिवसैनिक संपर्क नेते भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनात शाम बर्वे साठी प्रचारात उतरले आहे.
पारवेंच्या उमेदवारीमुळे शिंदे गटातच नाराजी
भाजपने हा मतदारसंघ पदरी पाडून घेण्याचे प्रयत्न केले. पण शिंदे यांनी ते यशस्वी होऊ दिले नाही, पण भाजपने दिलेले राजू पारवे हे उमेदवार त्यांना स्वीकारावे लागले. काँग्रेसमधून आलेल्या पारवेंसाठी विद्यामान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारल्याने शिंदे गटात नाराजी आहे. हि नाराजी काँगेस उमेदवार बर्वे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
सुनील केदार, राजेंद्र मुळक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांचे उत्तम जाळे आहे. त्याच्याच गटाकडे जिल्हा परिषदेत सत्ता आहे. काँग्रेसचे सर्व गट व नेते यावेळी त्यांच्यासोबत आहेत. याशिवाय ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार) अनिल देशमुख यांचा गटसोबत असल्याने त्यांच्या आधारावर काँग्रेसने हा रामटेकचा गड पुन्हा सर करण्याचा दावा केला आहे.
काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचे जात प्रमाण पत्र एनवेळी रद्द ठरवीण्यात आले. या विरोधात त्या न्यायालयात गेल्यावर त्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने बर्वे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये विशेषतः महिलांमध्ये निर्माण झाली आहे. बच्चू कडू यांनी कॉग्रेसला पाठिंबा दिला आहे. हिंगणा आणि कामठी विधान सभा मतदार संघातून कोणाला जास्त रसद मिळते यावर विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.