पृथ्वी शॉ मारहाण प्रकरण : पोलिसांवर कारवाईचे आदेश द्या, सपना गिलची उच्च न्यायालयात मागणी

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासह अन्य आरोपींविरोधात विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी तक्रार करूनही मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. त्यामुळे, मुंबईच्या पोलीस आयुक्तांसह सात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर सपना गिलने उच्च न्यायालयात याचिकेमार्फत केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेचेसेवक म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (विनयभंग) अंतर्गत दखलपात्र गुन्ह्यासाठी दिलेली माहिती नोंदवून घेणे आणि आवश्यक असून त्यामार्फत कारवाई करणेही गरजेचे होते. वारंवार मागणी करूनही आपल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलीस आयुक्तांशीही संपर्क साधून त्यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार शॉ व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी अपेक्षा होती, असा दावा सपनाने पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करताना केला आहे.

अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर शॉ आणि अन्य आरोपींनी आपला विनयभंग केल्याचा सपनाचा आरोप असून याप्रकरणी सपनाला 23 फेब्रुवारी रोजी अटक करून त्यानंतर तिची जामिनावर सुटका केली. सपनाने शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती.

परंतु, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा न नोंदवल्याने सपनाने महानगरदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. तिच्या तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांनी 3 एप्रिल रोजी सांताक्रूझ पोलिसांना चौकशी करून 19 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तथापि, पोलिसांवर कारवाई करण्याची सपनाची मागणी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली. त्याविरोधात सपनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.