राज्यातील 440 मतदान केंद्रांवर महिलाराज; पोलिसांपासून अधिकारी, कर्मचारी सर्वच महिला

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महिलांसाठी विशेष मतदान केंद्रेही ठेवण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला असणार आहेत. राज्यभरात अशा 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती असणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्रे’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार ही विशेष महिला मतदान केंद्रे बनवण्यात येणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रात कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

ठाणे जिह्यात अशी सर्वात जास्त 36 मतदान केंद्रे असणार आहेत. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्रे

नगर 12, अकोला 6, अमरावती 8, छत्रपती संभाजीनगर 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4, उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.