मोदी सरकारला आता जनताच खाली खेचेल

धोका देऊन सत्तेत आलेल्या खोके सरकारने महाराष्ट्राची अवस्था दैनिक करून ठेवली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र 100 टक्के प्रगतीपथावर होता. मात्र आता हीच प्रगती शून्याच्या खाली गेली आहे. खोटे बोलायचे, जुमला करायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना फसवायचे, हाच कार्यक्रम भाजप आणि खोके सरकारने सुरू केला. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत देशातील जनताच आता केंद्रातील मोदी सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये व्यक्त केला.

नवी मुंबई शहरातील सिवुड, इंदिरानगर, घणसोली आणि ऐरोली येथे आदित्य ठाकरे यांच्या आज चार सभा झाल्या. या सर्व सभांना शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पेंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील खोके सरकारचे वस्त्रहरण केले. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था कुठे दिसत नाही. तीस महापालिकांवर खोके सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. हे प्रशासक पाठवण्यासाठी कोटींच्या बोली लागत आहेत. प्रशासकांनी या खोके सरकारच्या एकूण आपले हात काळे करू नयेत. कारण 2024 मध्ये राज्यात आमचे सरकार येणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर हात काळे करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, एम.के. मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, संतोष घोसाळकर प्रकाश पाटील, सुमित्र कडू, सूर्यकांत मढवी, संदीप पाटील, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, काशीनाथ पवार, सोमनाथ वासकर, महेश कोटी वाले समीर बागवान, पूनम आगवणे, कोमल वासकर आदी उपस्थित होते.

– संभाजीनगरमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र हे दोन्ही नावे देण्यासाठी केंद्र सरकारकडून टाळाटाळ चालली आहे. यावरून केंद्र सरकार हे महाराष्ट्र विरोधी असल्याचे उघड होत आहे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.