आमची बाजू सत्याचीच; संजय राऊत यांचा नार्वेकरांवर निशाणा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना चोर-लफंग्यांच्या हाती दिल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात लवादाची जागोजागी अंत्ययात्रा निघाली. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खदखद निर्माण झाली आहे. महाराष्ट्रच काय, तर लवादाने दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. आमची बाजू सत्याचीच असल्याचे त्यांनी परखडपणे सांगितले.

आम्ही कुठेही चूक केली नाही. शिवसेनेविरोधात दिलेल्या निकालानंतर देशात जे वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहे, असे नमूद करताना कर नाही, डर नाही म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली आहे, असे संजय राऊत म्हणाले. ज्यांना पुरावा दिसला नाही त्यांना ‘पुरावा की गाडावा’ हा निकाल येथे बसलेल्या न्यायमूर्तींनी घ्यायचा आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. आमची बाजू सत्याची असूनदेखील आमच्यावर अन्याय केला गेला. मात्र इमानदारी कोणत्या कायद्याची मौताज होऊ शकत नाही, असा इशारा देत येणाऱ्या निवडणुकीत खरा निकाल दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.