शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे राऊत म्हणाले. यावेळी माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, सचिन कोठे, शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभाताई घोगरे, संजय छल्लरे, सुयोग सावकारे, श्रीकांत मापारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्हीच खरी शिवसेना असून एकनाथ शिंदे शिवसेना स्थापन करायला गेले होते का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील किंवा नसतीलही अशी टीकाही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर महसूलमंत्री नाही तर आमसूलमंत्री असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता राधाकृष्ण विखे-पाटील यांना लगावला..
नगर-दक्षिणच्या जागेबाबतही राऊत यांनी भाष्य केले. सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेच्या अदलाबदली संदर्भात चर्चा झालेली नाही. मात्र शंकरराव गडाख त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरही निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा; संजय राऊत यांचा घणाघात
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे न्यायदानाची जबाबदारी सोपवली आहे. ते सो कॉल्ड न्यायमूर्ती काल मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे न्यायमूर्तीच फुटताना दिसत आहेत. न्यायमूर्तीच आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशी टीका राऊत यांनी केली.
View this post on Instagram