‘खिचडी’ कोण बनवणार? शेफ विष्णू मनोहर की त्यांचे सहाय्यक; चंद्रपूरात चर्चांना उधाण

अनेक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याच्या तक्रारी पालकांनी अनेकदा केल्या आहेत. त्यामुळे खिचडी हा नेमही चर्चेचा विषय असतो. आता चंद्रपूरातही खिचडीची चर्चा रंगली आहे. या चर्चेचे कारण म्हणजे ही खिचडी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर शिजविणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर कृषी विभागाने ही माहिती खोटी असल्याचे सांगत विष्णू मनोहर स्वत: चंद्रपुर येथे येणार नसून त्यांचा असिस्टंट खिचडी बनवण्यासाठी येणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे या खिचडीची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

खिचडी साधीच असणार आहे पण फरक एवढाच की ही खिचडी 6,500 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार आहे. त्यामुळेच चंद्रपुर जिल्ह्यात या खिचडीची चर्चा रंगताना दिसत आहे. जिल्हा प्रशासन सुद्धा या खिचडीला घेऊन फारच गंभीर असल्याचे दिसत आहे. या खिचडीला एक राजकीय इव्हेंट म्हणून पुढे केले जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात सुरु आहे.

चंद्रपुर जिल्हा कृषी महोत्सवात शुक्रवारी 6500 किलोची खिचडी बनवली जाणार आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र या उपक्रमात एका विशिष्ट राजकीय व्यक्तीला प्रमोट केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. जिल्हा कृषी महोत्सव हा विशेष करुन शेतकऱ्यांचा आणि शेती पुरक व्यवसाय करणाऱ्यांचा आहे. मात्र या कृषी महोत्सवात चर्चा मात्र खिचडीची आहे. त्यामुळे या खिचडीला एक राजकीय इव्हेंट म्हणून पुढे करु नये अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.

अशी आहे तयारी…

बाजरी या मिलेट धान्‍यासोबतच सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार होणार आहे. यासाठी 10 फूट व्‍यासाची, 5 फूट कढई वापरली जाणार आहे. त्‍याकरिता सुमारे 500 किलो लाकूड वापरले जाईल. विष्‍णू मनोहर यांनी या आधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली होती. तसेच खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे, या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डीलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना 6500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.