महाराष्ट्र लुटता यावा म्हणूनच उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले, आमदार-खासदार फोडले! – संजय राऊत

टेस्लाचा प्रकल्प, पाणबुडी प्रकल्प आणि त्याआधीचे अनेक प्रकल्प, यासह मुंबईतील हिरे व्यापार आमच्या डोळ्यादेखत घेऊन जात असताना हे सरकार, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री डोळ्यावर कातडे ओढून आणि तोंडाला कुलुप लावून बसले आहेत. इतके नामर्द सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाले नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्राचा रोजगार ओरबाडून नेला जात आहे. तुम्हाला गुजरात सोन्याने मढवायचा असेल तर मढवा पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटताय? महाराष्ट्र लुटता यावा म्हणूनच उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले गेले. आमदार फोडले, खासदार फोडले गेले ते फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच, असेही खासदार राऊत म्हणाले. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांचे सोम्या-गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे आणि जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. सोम्या-गोम्या कोण आहेत ते 2024 ला कळेल. महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग, रोजगार पळवले जात असताना आणि महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याचे सरकारमधील हौशे-नौशे-गौशे तोंडाला कुलुप लावून गप्प आहेत. इतके नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासता झाले नसतील. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय, मुंबई तोडली जातेय, मुंबई-पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असतानासुद्धा तुरुंगात जाऊ या भयाने लटपटणाऱ्यांनी आमच्यावर बोलूच नये, असा टोला राऊत यांनी अजित पवारांनी लगावला.

दरम्यान, जयंत पाटील सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, जयंत पाटील दोनच दिवसांपूर्वी मातोश्रीवर होते आणि त्यांच्याबाबत अशा अफवा पसरवून काही उपयोग नाही. ज्याला जायचे होते, ते डरपोक, बेईमान लोकं निघून गेले आणि आता जे थांबले आहेत ते एका निष्ठेने, मग शिवसेनेत असतील किंवा शरद पवार यांच्यासोबत असतील त्यांना विविध आमिषं दाखवली जात आहेत. दबाव आणला जात आहे. पण आता जे आहेत ते अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोकं आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरवून गोंधळ होणार नाही.